रस्त्यावर कोणी वाद घालत असल्यास राहा सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:00+5:302021-09-21T04:29:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना नियम बंद करून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावरील गर्दीही ...

रस्त्यावर कोणी वाद घालत असल्यास राहा सावधान!
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना नियम बंद करून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावरील गर्दीही वाढली आहे. यात विनाकारण रस्त्यावर धक्का लागला म्हणून, वाहनांची धडक झाली म्हणून वाद काढून त्याव्दारे पैसे उकळण्याची शक्यता असल्याने रस्त्यावर असा प्रकार झाल्यास तत्काळ पाेलिसांची मदत घेणेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नंतर होणारा मनस्ताप कमी होण्यास मदतच होईल.
सांगली शहरासह जिल्ह्यात असे प्रकार खूपच कमी असले तरी राष्ट्रीय महामार्गावर असे प्रकार सर्रास होत असतात. त्यानुसार विनाकारण वाहन अडवून वाद सुरू करत पैसे उकळण्याचे प्रकार होत असतात. त्यात आपल्याला पुढचा प्रवास असल्याने अनेकजण वाद वाढवत बसण्यापेक्षा शे-पाचशे रुपये देऊन वाद मिटविण्याकडेच लक्ष देतात.
त्यामुळे वाहन आडवे मारले म्हणून असेल किंवा अन्य कारणाने कोणी वाद सुरू केल्यास वादावादी न वाढविता थेट पोलिसांची मदत घेतल्यास अशा लुटारूंना चाप बसणार आहे.
चौकट
महामार्गावर असे प्रकार
सांगली शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विनाकारण वाद घालून लुटण्याचे प्रकार होत नाहीत. मात्र, त्याचवेळी काहीतरी कारणाने वाहन अडवून अथवा वाटसरूंना थांबवून त्यांना लुटण्याचे प्रकार सुरू असतात. वाद घालून लुटण्याचे प्रकार महामार्गावर होत असतात.
चौकट
तुमच्याबाबतीतही घडू शकते
१) राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा टायर पंक्चर झाला आहे म्हणून थांबवून लुटण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. याशिवाय वाहनातून घाण टाकल्याचे कारण सांगून पण असे प्रकार घडले आहेत.
२) वाहन वेगात असताना, विनाकारण आडवे मारल्याचे कारण सांगून अडविण्याचे प्रकार घडतात. आपला वेग नियंत्रणात असतानाही आडवे मारले म्हणून थांबवत मांडवली करत व्यवहार काही हजारात केला जातो.
चौकट
काय काळजी घ्याल?
कुटुंबीयांसह प्रवास करताना, शक्यतो रात्रीची वेळ टाळावी. तरीही प्रवास केलात, तर रस्त्यावरील गर्दीचा अंदाज घेऊन प्रवास करावा. अनोळखी वाहन पुढे अथवा मागे वारंवार येत असल्यास आपण सतर्क राहावे. अनोळखी व निर्जन ठिकाणी कोणी कितीही अडवत असले तरी थांबू नये.