अवकाळीग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: June 11, 2015 00:27 IST2015-06-10T23:29:15+5:302015-06-11T00:27:46+5:30
जत तालुक्यात चार हजार लाभार्थी वंचित : एक कोटीचा प्रस्ताव लाल फितीत

अवकाळीग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत
संख : मार्चमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीच्या प्रतीक्षेत जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून आहेत. रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा पिकासह द्राक्षे, फळबागांचेही नुकसान झाले होते. तालुक्यातील २ हजार १७३.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे द्राक्षांचे नुकसान प्रशासनाच्या कागदावर अजिबातच झालेले नाही.
तालुक्यामध्ये २८ फेबु्रवारी व एक मार्च असे सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर दोन-तीन दिवसांच्या अंतराने १५ मार्चपर्यंत अवकाळीने तडाखा दिला. रब्बी हंगामातील पिकांची काढणी व द्राक्ष हंगामाच्या काळातच पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी, हरभरा, गहू, खपली, मका या पिकांसह द्राक्षे व बेदाण्याचे मोठे नुकसान झाले होते. द्राक्षमण्यांना तडे गेले. ज्वारी, गहू, रानात भिजला. ज्वारी काळी पडली. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. शेडवरील बेदाणा भिजून काळा पडला. उतारा कमी निघाला.
जिल्हा प्रशासनाने कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे.
पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, द्राक्षे - ०० हेक्टर, तर बेदाण्याचे ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. पंचनाम्यातून बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला वगळले आहे. सर्वाधिक नुकसान होऊनही फक्त ९८५.५० टन बेदाण्याचे नुकसान दाखविण्यात आले आहे. हजारो टन बेदाणा रॅकवर भिजला आहे. तीन हजार टन बेदाणा काळा पडला आहे. त्याची गुणवत्ता कमी झाली आहे. बेदाणाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनसुद्धा पंचनाम्यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले.
द्राक्षांचे नुकसान बेदखल...