वारणा धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांसाठी नोकरीत १५ टक्के आरक्षणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:56+5:302021-02-16T04:28:56+5:30
इस्लामपूर : वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे गेल्या ३०-३५ वर्षांतील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न विशेष मोहिमेद्वारे आम्ही सोडवू शकलो, ...

वारणा धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांसाठी नोकरीत १५ टक्के आरक्षणाचा प्रयत्न
इस्लामपूर : वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे गेल्या ३०-३५ वर्षांतील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न विशेष मोहिमेद्वारे आम्ही सोडवू शकलो, याचे मोठे समाधान आम्हा सर्वांना आहे. जल संधारण खात्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्यासाठी नोकरीमध्ये जे ५ टक्के आरक्षण आहे ते १० किंवा १५ टक्के करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. ते लवकरच करून घेऊ, असा विश्वास जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथे जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षापूर्ती व फल निष्पत्ती मेळाव्यात ते बोलत होते. आ. मानसिंगराव नाईक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, युवा नेते प्रतीक पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी धरणाच्या उभारणीसाठी मोठा त्याग केला आहे. मात्र, तुम्हाला मोर्चे, आंदोलने करण्यात तुमच्या दोन पिढ्या गेल्या. त्यामुळेच मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर तातडीने आपले प्रश्न सोडविणारी मोहीम हाती घेतली. पुढच्या १०-२० वर्षांत सुटले नसते ते साधारण ७०-८० टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत.
आ. नाईक म्हणाले, मंत्री जयंत पाटील यांनी धडक मोहीम हाती घेतल्याने आपले इतक्या वर्षाचे प्रश्न मार्गी लागले असून आपल्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा उमटल्या आहेत. आता शेवटच्या माणसाचे काम पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही.
तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी स्वागत केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महेश सुर्वे, प्रमोद धानके, डी. डी. शिंदे, बसवराज मास्तोळी, अरविंद लाटकर, किशोर जाधव, महादेव मोहिते, शुभांगी पाटील, नेताजीराव पाटील, दादासाहेब पाटील, संजय पाटील, संजय कोरे, विजयराव पाटील, देवराज पाटील, संभाजी कचरे, भरत देशमुख, किसन मलप, शंकर सावंत उपस्थित होते. मिरजचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी आभार मानले.
चाैकट
पुस्तिकेचे प्रकाशन
या कार्यक्रमात जिल्ह्यातील २९ वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांना जमीन, भूखंड, तसेच नागरी सुविधेच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
फोटो-१५इस्लामपुर१
फोटो ओळी- इस्लामपूर येथे वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, सौरभ राव, डॉ. अभिजित चौधरी, गोपीचंद कदम, प्रतीक पाटील उपस्थित होते.