महापालिका पाणीपुरवठा अधिकार्यांवर हल्लाबोल
By Admin | Updated: June 3, 2014 01:24 IST2014-06-03T01:21:08+5:302014-06-03T01:24:02+5:30
अपुरा पाणीपुरवठा : दूषित पाणी कार्यालयात ओतण्याचा इशारा

महापालिका पाणीपुरवठा अधिकार्यांवर हल्लाबोल
सांगली : शहरातील गुलाब कॉलनी, साई मंदिर परिसर या भागात गेल्या चार महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने आज सोमवारी या परिसरातील महिलांनी पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला. २४ तास पाणी योजनेत समावेश असूनही घागरभरही पाणी मिळत नाही. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास दूषित पाणी कार्यालयात ओतण्याचा इशाराही यावेळी दिला. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन कोलमडले आहे. दर आठवड्याला एका भागातील महिलांचा मोर्चा पाणीपुरवठा विभागावर येत आहे. सोमवारी गुलाब कॉलनी, साईमंदिर परिसरातील नागरिक, महिलांनी मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून या परिसरात दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. मोर्चाला सामोरे जाताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, तत्त्व ग्लोबलचे गुलाब पाटील यांच्यावर महिलांनी प्रश्नांचा भडीमार करीत घेराव घातला. महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेत हा परिसर समाविष्ट आहे. महिनाभर सुरळीत पाणी येते, नंतर मात्र अपुरा पाणीपुरवठा होतो. या परिसराच्या आजूबाजूला असलेल्या हनुमाननगरमध्ये मात्र मुबलक पाणी मिळत आहे. व्हॉलमनच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोपही महिलांनी केला. महापालिकेने लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर अधिकार्यांच्या कार्यालयात पाणी ओतण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रभाग दोनचे सभापती युवराज गायकवाड, शंकर आष्टेकर, भारती जाधव, इंदूबाई पाटील, सिद्धू गरुड, वर्षा पाटील, रूपाली नंदे, वर्षा नरुटे, शालन पोतदार आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)