कामेरीजवळील अपघातात आटपाडीचा एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:35+5:302021-03-13T04:48:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत पहाटे साडेचारच्या सुमारास कोल्हापूरकडे ऊस भरून ...

कामेरीजवळील अपघातात आटपाडीचा एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत पहाटे साडेचारच्या सुमारास कोल्हापूरकडे ऊस भरून चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून आलेल्या मोटारीची जोरदार धडक बसल्याने एकजण जागीच ठार, तर दोघे जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की मृताचे शीर धडापासून वेगळे होऊन पाठीमागील सीटवर पडले होते.
आप्पासाहेब श्रीराम कदम (रा. कौठुळी, ता. आटपाडी) असे मृताचे नाव आहे. गणेश मोहन सुतार (३०) आणि चालक सुनील मोहन सुतार (३६, दोघे रा. कौठुळी, ता. आटपाडी) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक पंडित रावल जाधव (रा. शिगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोटारचालक सुनील सुतार याच्याविरुद्ध अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंडित जाधव ट्रॅक्टरला (क्र. एमएच ०९-सीजे ३३५४) दोन ट्रॉल्या जोडून त्यातून उसाची वाहतूक करत होते. कोल्हापूूरकडे जात असताना कामेरीच्या हद्दीत आल्यावर यश धाब्यासमोर पाठीमागून आलेल्या मोटारीने जोराची धडक दिली. जाधव यांनी ट्रॅक्टर थोड्या अंतरावर उभा करून पाहिल्यावर पाठीमागील ट्रॉली पलटी झाली होती. तेथून काही अंतरावर धडक दिलेली मोटार त्यांना दिसली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारीतील आप्पासाहेब कदम यांचे शीर धडावेगळे होऊन मोटारीतच पाठीमागील बाजूस पडले होते. अन्य दोघे जखमी झाले होते. महामार्गावरील नागरिकांनी शासकीय रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी पाठविले.