अनाथांना लाभले आकांक्षांचे पंख
By Admin | Updated: June 18, 2014 01:24 IST2014-06-18T01:17:08+5:302014-06-18T01:24:22+5:30
अनाथाश्रमातील यशोगाथा : दहावीच्या यशाने बहरली मने

अनाथांना लाभले आकांक्षांचे पंख
अविनाश कोळी ल्ल सांगली
कोणी कुटुंबाच्या अठराविश्वे दारिद्र्याने, कोणी पितृछत्र तर कोणी मातृछत्र हरपले म्हणून अनाथालयात आलेले... परिस्थितीने खचलेल्या मनांना आधार देण्यासाठी मदतीचे शेकडो हात सरसावले... भविष्याप्रती बेभरवसा वाटत असलेल्या इवल्याशा रोपट्यांना खतपाणी घालून वाढविण्यात आले. दहावीच्या निकालामुळे या चिमुकल्यांच्या आयुष्यात आता नवा बहर फुलून त्यांना आकांक्षांचे पंख लाभले आहेत.
सांगलीतील वेलणकर अनाथाश्रम, मिरजेतील पाठक अनाथाश्रम येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खडतर प्रवास करून यशाला गवसणी घातली आहे. पाठक अनाथाश्रमातील अमोल ज्ञानू व्हनमाने याने ८१ टक्के गुण मिळविले. पितृछत्र हरपल्यानंतर तो येथे दाखल झाला होता. विद्यामंदिर प्रशालेत तो शिकत आहे. सांगलीच्या वेलणकर अनाथाश्रमातील सात मुलींनी दहावीचा टप्पा ओलांडताना मनी बाळगलेल्या स्वप्नांना बळ दिले. सुरेखा लक्ष्मण कागल या मुलीने ७२ टक्के गुणांसह गुजराती हायस्कुलमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने दारिद्र्याने खचलेल्या कागल कुटुंबावर मोठे संकट कोसळले. मुलीची सुरक्षितता आणि शैक्षणिक भविष्याकरिता आईने तिला अनाथाश्रमात दाखल केले. परिस्थितीने खचलेल्या या मुलीला आश्रमातील अन्य मुली, येथील कर्मचाऱ्यांनी आधार दिला. सुरेखाप्रमाणेच अन्य मुलींच्याही कहाण्या अशाच.
दहावीचे यशोशिखर गाठण्याची किमया येथील सात मुलींनी केली. पौर्णिमा थोरात (६५ टक्के), पूजा कुलकर्णी (५५ टक्के), अश्विनी माने (५२ टक्के), स्वाती चिखलकर (४५ टक्के), माधुरी ढवळे (४१ टक्के) आणि शिवानी पाटील (३८ टक्के) या सात मुलींना आता उज्ज्वल भविष्याचे पंख लाभले आहेत. कोणाला शिक्षिका, कोणाला धावपटू, कोणाला वैद्यक शाळेतील तंत्रज्ञ बनायचे आहे. त्यांना बळ देण्याचे काम आता अनाथाश्रमामार्फत सुरू आहे.
अनाथाश्रमाच्या अधीक्षक अनुराधा डुबल, समुपदेशक स्मिता सपकाळ, केसवर्कर आरती तळवळकर, गृहमाता शीला ओहल यांच्यासह सर्वच कर्मचारी आणि संस्थेचे अध्यक्ष रामसाहेब वेलणकर, सचिव अंजुताई वेलणकर यांच्याबद्दल या सर्व मुलींना आदर वाटतो. जडणघडणीचे श्रेय त्या सर्वांना देत आहेत.