रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:22+5:302021-02-05T07:32:22+5:30
मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना लवाद नियुक्तीसाठी निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करा
मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना लवाद नियुक्तीसाठी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ हा मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून जातो. त्यासाठी अनेक एकर शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीचे मुल्यांकन चुकीचे झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यांमधील काही शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला अद्याप स्वीकारलेला नाही तर काहींनी सशर्त स्वीकारला आहे. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ही कोंडी फुटण्यासाठी लवादाची नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे. सांगलीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भात महेश सलगरे, रवींद्र पाटील, महादेव कौलापुरे, प्रमोद कबाडे, सचिन पाटील, अरविंद गुळवणे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात शेतीचे मुल्यांकन करताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मोबदल्याचा निवाडा एकतर्फी केला. जमिनींचे बाजारमूल्य मनमानीपणाने निश्चित केले. तसेच भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा विचार न करता मोघम किमती निश्चित केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याविषयी दाद मागण्यासाठी लवादाची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे आहे. भूसंपादन होऊन दोन-तीन वर्षे झाली तरी तो अद्याप नेमला गेलेला नाही, असे म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी स्वीकारले.
-------------