पानसरेंवरील हल्ला दहशतवादी कृत्य घोषित करा

By Admin | Updated: May 1, 2015 00:16 IST2015-04-30T23:24:58+5:302015-05-01T00:16:43+5:30

भालचंद्र कांगो : भूसंपादन कायद्याविरोधात १४ मे रोजी आंदोलन

Announce the attack on Pansar, a terrorist act | पानसरेंवरील हल्ला दहशतवादी कृत्य घोषित करा

पानसरेंवरील हल्ला दहशतवादी कृत्य घोषित करा

सांगली : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला शासनाने दहशतवादी कृत्य म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्याकरिता दि. १४ मे रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. कांगो म्हणाले की, पानसरे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने दीडशे टीम तयार केल्या आहेत, परंतु तरीही मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. आता त्यांनी एसआयटीकडे तपास सोपवून तपासात अपयशी ठरल्याचीच कबुली दिली आहे. वास्तविक पानसरे आणि दाभोलकर यांच्या विचारांची भीती वाटणाऱ्या संघटनांनीच त्यांचा पध्दतशीरपणे खून केला आहे. शासनाने दोन्ही खुनांच्या घटना या दहशतवादी कृत्य असल्याचे मान्य करणे गरजेचे आहे.
ते म्हणाले की, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचा शासनाचा डाव आहे. शासन हे उद्योगपतींच्या लाभासाठी दलालाचे काम करीत आहे. भूमी अधिग्रहण कायदा करण्याचा अट्टाहास केंद्र शासन करीत आहे. त्याला सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाकपतर्फे दि. १४ मे रोजी देशपातळीवर रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

धार्मिक उन्मादासाठी गोहत्याबंदी
समाजातील धार्मिक उन्माद वाढविण्यासाठीच शासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणला आहे. भाकड गाई सांभाळणे हे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने उन्हाळ्यात भाकड गाई भाजप कार्यालयासमोर बांधून त्यांचा सांभाळ कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन लवकरच करण्यात येणार असल्याचे डॉ. कांगो यांनी सांगितले.

Web Title: Announce the attack on Pansar, a terrorist act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.