‘अण्णासाहेबांचा’ मुक्काम मुख्यालयाबाहेर

By Admin | Updated: June 6, 2015 00:24 IST2015-06-05T23:46:47+5:302015-06-06T00:24:21+5:30

शासनाच्या आदेशाची पायमल्ली : खानापूर-कडेगाव तालुक्यातील ग्रामसेवकांची सोयीनुसार ‘सेवा’--लोकमत विशेष

'Annasaheb's stay' outside the headquarter | ‘अण्णासाहेबांचा’ मुक्काम मुख्यालयाबाहेर

‘अण्णासाहेबांचा’ मुक्काम मुख्यालयाबाहेर

दिलीप मोहिते -विटा -ग्रामीण भागाच्या विकासातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा आदेश असतानाही, खानापूर तालुक्यातील बऱ्याच ग्रामसेवक, अण्णासाहेबांचा सध्या विटा शहरात मुक्काम असल्याचे उजेडात आले आहे. या अण्णासाहेबांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून शहरात वास्तव्य करणे पसंत केले आहे.
या प्रकाराकडे वरिष्ठांनीही दुर्लक्ष केल्याने ‘अण्णासाहेब’ आपल्या वेळेनुसार व मर्जीनुसार ग्रामीण लोकांच्या सेवेत सहभागी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामीण भागाची, गावाच्या विकासाची केंद्रबिंदू ठरत आहे. तेथील प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक, अण्णासाहेबांची नियुक्ती करण्यात येते. गावातील शासकीय विकास कामांसह ग्रामस्थांना विविध सेवा, सुविधा पुरविणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम या ग्रामसेवकांचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये व त्यांची प्रशासकीय कामे अडकून पडू नयेत, यासाठी शासनाकडून ग्रामसेवक, अण्णासाहेबांना नोकरीच्या गावातच मुक्कामास राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यात ६५ ग्रामपंचायती असून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची संख्या ४९ आहे. यातील अनेक ग्रामसेवकांना दोन ते तीन गावांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार यातील बरेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. परंतु, तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ ग्रामसेवक मुख्यालय सोडून विटा शहरात राहत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या प्रशासकीय कामांमध्ये दिरंगाई होत असल्याची बाब वारंवार अधोरेखीत झाली आहे.
या प्रकाराकडे वरिष्ठांनीही दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मुख्यालय सोडून विट्यात राहणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस गटविकास अधिकारी दाखवित नसल्याची नागरिकांत चर्चा आहे.
खानापूर तालुक्याचे विभाजन होऊन कडेगाव तालुका अस्तित्वात आला असला तरी, त्या तालुक्यातीलही बऱ्याच ग्रामसेवकांचा विटा शहरात मुक्काम आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ठोस निर्णय घेऊन ग्रामीण जनतेच्या प्रशासकीय कामांना विलंब व शासनाच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता घेऊन मुख्यालयाबाहेर वास्तव्यास असलेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.


खानापूर तालुक्यातील ग्रामसेवक...
खानापूर तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीत ५ ग्रामविकास अधिकारी व ४४ ग्रामसेवक कार्यरत आहेत. खानापूर पंचायत समितीकडे तालुक्यासाठी ५१ ग्रामसेवक व ६ ग्रामविकास अधिकारी अशी ५७ जागांची मंजुरी आहे. परंतु, ग्रामसेवकांची ७ व ग्रामविकास अधिकारी १ पद रिक्त आहे. त्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. परिणामी, गावातील कामकाजाचा दिवस ठरविला जात नसल्याने ग्रामसेवक या तीन गावांपैकी नक्की कोणत्या गावात आहे, हे शोधणे ग्रामस्थांना जिकिरीचे होत आहे.

चौकशी करणार
ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे नियमानुसार बंधनकारक आहे. काही ग्रामसेवक मुख्यालयात राहतात, तर काहीजण बाहेरगावी राहत असले तरी सरपंचांनी दाखला दिल्यानंतर आम्ही संबंधित ग्रामसेवक मुख्यालयातच राहत असल्याचे ग्राह्य धरतो. तरीही याबाबत चौकशी केली जाईल. प्रशासकीय गैरसोय दूर व्हावी, यासाठी योग्य तो निर्णय घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.



कडेगावचे ग्रामसेवक विट्यात मुक्कामास
खानापूर तालुक्याचे विभाजन होऊन कडेगाव तालुका अस्तित्वात आला असला तरी, त्या तालुक्यातीलही बऱ्याच ग्रामसेवकांचा विटा शहरात मुक्काम आहे, याबाबतही नोंद घेण्याची गरज आहे.




कागदोपत्री मुख्यालयात...
ज्या गावात ग्रामसेवक नोकरीस आहे, त्या गावात ग्रामसेवकाने राहणे बंधनकारक आहे. परंतु, तसे होत नाही. बरेच ग्रामसेवक विट्यात राहण्यास आहेत. संबंधित ग्रामसेवक मुख्यालयात राहतात का, याची तपासणी गटविकास अधिकारी करतात. त्यासाठी सरपंचांनी दाखला देणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक मुख्यालयात राहतात का? याबाबतचा दाखला सरपंच यांच्याकडून घेतला जातो. हा दाखला मिळविण्यासाठी ग्रामसेवक संबंधित गावातील सरपंचाशी हातमिळवणी करतात. त्यानंतर सरपंचाकडून मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामास राहत असल्याबाबतचा दाखला घेऊन ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांकडे देतात. त्यामुळे ‘अण्णासाहेब’ फक्त कागदोपत्रीच मुख्यालयात मुक्कामास राहत असल्याचे यावरून दिसून येते. अनेक ग्रामसेवक विटा, खानापूर येथे मुक्कामास राहून सोयीप्रमाणे सेवेच्या गावी उपस्थित राहत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: 'Annasaheb's stay' outside the headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.