राष्ट्रवादीकडून यंदा अमरसिंह देशमुख रिंगणात

By Admin | Updated: June 21, 2014 00:21 IST2014-06-21T00:20:40+5:302014-06-21T00:21:24+5:30

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघ : शरद पवारांनी बोलावणे धाडले

Amarsingh Deshmukh in the ring this time from NCP | राष्ट्रवादीकडून यंदा अमरसिंह देशमुख रिंगणात

राष्ट्रवादीकडून यंदा अमरसिंह देशमुख रिंगणात

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असताना, माजी आमदार अनिल बाबर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना आज (शुक्रवारी) बोलावणे धाडले आहे. विश्वसनीय माहितीनुसार, यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा मतदारसंघ काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे आला आहे. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना, विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा विजयाच्या गुलालापासून राष्ट्रवादी वंचित राहिली. याचे शल्य गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यापासून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केले आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सगळे नेते एकत्रित येऊनही निसटता पराभव झाला. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाल्याने, ही मंडळी ताकसुध्दा फुंकून पिण्याची काळजी घेताना दिसत आहेत.
या मतदारसंघातील राष्ट्रवादीपुरता विचार केला, तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना, राष्ट्रवादीने येथे अपक्ष म्हणून का असेना, उमेदवार उभा केलेलाच आहे. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या कमी नाही, पण आजपर्यंत आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख आणि खानापुरातून अनिल बाबर हेच नेते विधानसभेचे प्रमुख दावेदार राहिले आहेत. देशमुखांनी बाबर यांना दोनवेळा पाठिंबा दिला आहे, मात्र बाबर यांनी आजपर्यंत एकाही विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना पाठिंबा दिलेला नाही.
अशा परिस्थितीत मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत, एकदिलाने काम केले आणि नवीन चेहरा दिला, तर नक्की जिंकू, अशी मते दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी मांडल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे माजी आमदार अनिल बाबर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. बाबर यांनी ही बाब नाकारली असली तरी, चर्चेला उधाण आले आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीकडे राजेंद्रअण्णा देशमुख किंवा अमरसिंह देशमुख यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही.
आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना, अमरसिंह देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून थेट शरद पवार यांनी संपर्क साधला. विशेष म्हणजे देशमुख यांचा मोबाईल ‘सायलेंट मोड’वर असल्याने बराचवेळ त्यांना मुंबईतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखद्द शरद पवार संपर्क साधत असल्याचे लवकर कळले नाही. नंतर राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयातून सांगली जिल्हा परिषदेत संपर्क साधून देशमुख यांना तात्काळ मुंबईशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. देशमुख यांनीही तातडीने संपर्क साधला. वास्तविक देशमुख यांनी सोमवारी शेतकऱ्यांसोबत आदर्श शेती पाहण्याचे नियोजन केले होते. मात्र मुंबईचा दूरध्वनी ठेवताच त्यांनी गंभीर होत सोमवारचा येथील कार्यक्रम रद्द केला.

Web Title: Amarsingh Deshmukh in the ring this time from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.