विट्यात शेतीमालाचे सौदे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:13+5:302020-12-09T04:22:13+5:30
विटा शहरातील बाजारपेठ सकाळी दहा वाजल्यानंतर काही प्रमाणात सुरू झाली होती. मात्र मंगळवारी पहाटे विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...

विट्यात शेतीमालाचे सौदे बंद
विटा शहरातील बाजारपेठ सकाळी दहा वाजल्यानंतर काही प्रमाणात सुरू झाली होती. मात्र मंगळवारी पहाटे विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणारे भाजीपाला व शेतीमालाचे सौदे पूर्णपणे बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख व संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापारी व शेतकऱ्यांनी खानापूर पूर्व भागातील भिवघाट, तामखडी तसेच परिसरात उस्फूर्तपणे बंद पाळला. खानापूर तालुक्यातील लेंगरे, माहुली, आळसंद, भाळवणी परिसरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
विटा बस आगारातील ग्रामीण व शहरी भागातील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मायणी, भिवघाट, सांगली, कऱ्हाड या मार्गावर तुरळक बस वाहतूक सुरू होती. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट
शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन...
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले काळे कायदे तातडीने रद्द करावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करीत खानापूर तालुका शिवसेना पक्षाच्यावतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी मंगळवारी विटा तहसील कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते, तालुकाप्रमुख सतीश निकम, पांडुरंग भगत, सुधीर ऊर्फ राजू जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ०८विटा: ओळी : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतीमालाचे सौदे बंद ठेवण्यात आले होते.