दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:12+5:302021-02-05T07:28:12+5:30
इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त ...

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे
इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त करावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कृषी न्यायालये स्थापन करून शेतकऱ्यांना दाद मागण्याचा अधिकार आणखी व्यापक करावा, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. याचवेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांकडे पाठ फिरविल्याने राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे गल्ली पातळीवरचे राष्ट्रीय नेते राहिल्याचा चिमटा शेट्टी यांचे नाव न घेता काढला.
आ. खोत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीसमोर २० फेब्रुवारीपर्यंत सूचना दाखल करता येणार आहेत. बरेच शेतकरी किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी हे तीन कृषी कायदे पूर्णपणे अभ्यासलेले नाहीत. त्यातून सांगी-वांगी तर्क या कायद्यावर काढले जात आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमाल पूर्णपणे वगळणे गरजेचे आहे. शेतमालाच्या बाजारपेठेवरचा सरकारी हस्तक्षेप पूर्ण बाजुला झाला पाहिजे. लायसन परमिट राज संपले पाहिजे, अशी रयत क्रांती संघटनेची स्पष्ट भूमिका आहे.
ते म्हणाले, या कायद्यात भाजीपाल्याच्या घाऊक दरात शंभर टक्के दरवाढ झाल्यावर आणि नाशिवंत नसलेल्या शेतमालात ५० टक्के दरवाढ झाली की, सरकार हस्तक्षेप करणार आहे, ही जाचक अट आम्हाला मान्य नाही. शेतमालाचे कितीही भाव वाढले तरी सरकारने त्यांच्या गोदामात साठवणूक केलेले धान्य हे बाजारपेठेतील किमती स्थिर करण्यासाठी बाहेर आणावे. दुसऱ्या बाजुला आयात - निर्यात धोरण हे किमान ५ वर्षांचे असायला हवे.
खोत म्हणाले, दिल्लीतील आंदोलन हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणणारे आहे. ३२ वर्षांपूर्वी शरद जोशींनी महेंद्रसिंग टिकेत यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे विराट दर्शन घडविले होते. यावेळी टिकेत आणि त्यांच्याबरोबरच्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोशी यांना मंचावरून खाली ढकलून देत नासधूस केली होती. आता ३२ वर्षांनंतर परत एकदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असताना टिकेत यांचा मुलगा राकेश हा या स्वातंत्र्याच्या आड आलेला आहे. शेतकरी सरकारच्या जोखडातून मुक्त झाला आणि शेती हा एक व्यवसाय म्हणून उदयाला आला तर शेतकऱ्यांच्या नावावरती शेतकऱ्यांचे नेते म्हणून टेंभा मिरवायला मिळणार नाही, हे खरे दु:ख शेतकरी नेत्यांच्या पोटामध्ये आहे. यावेळी लालासाहेब पाटील, विनायक जाधव, बजरंग भाेसले, सुजित डाळे उपस्थित होते.