तब्बल सहा वर्षांनी पलूसला आमसभा
By Admin | Updated: June 21, 2014 00:21 IST2014-06-21T00:19:18+5:302014-06-21T00:21:50+5:30
आज आयोजन : प्रशासनाची धावपळ

तब्बल सहा वर्षांनी पलूसला आमसभा
पलूस : आमसभा घेण्याबाबत तालुक्यातील नागरिकांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीला यश आले असून, शनिवार, दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता येथील पंचायत समितीच्या प्रांगणात तब्बल सहा वर्षांनंतर आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अचानकच आमसभा घेण्याचा निर्णय घोषित केल्यामुळे तालुक्यातील प्रशासन अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विविध विभागातील कागदपत्रांची जमवाजमव, तर काही ठिकाणी मेळ लावण्याचा प्रयत्न आज (शुक्रवार) रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे व सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या सहा वर्षांपासून पलूस व कडेगाव या तालुक्यात आमसभा झाली नसल्याने नागरिकांना आपल्या व्यथा कोणापुढे मांडाव्यात?, हा प्रश्न पडला होता. अधिकारी, कर्मचारी वर्गाची अरेरावी, रोहयोमधून मलिदा मिळणाऱ्या कामांना प्राधान्य देणे, सर्वाधिक कमिशन देणाऱ्यांनाच कामाचे ठेके देणे, सर्वसामान्यांना किरकोळ कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारावयास लावणे आदी गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. पंचायत समितीत कॉँग्रेसची सत्ता आहे. मात्र पदाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क नाही.
दरम्यान, २५ जूनपर्यंत आमसभा न घेतल्यास पलूस पंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला होता. अखेर प्रशासनाला सहा वर्षांनंतर का होईना, जाग आली आणि तडकाफडकी २१ जूनला आमसभेचा निर्णय घेण्यात आला. या आकस्मिक घोषणेमुळे पलूस तहसील व पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. कागदपत्रे व रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. (वार्ताहर)