लोकसभा पराभवानंतर काँग्रेसचे नेते सरसावले
By Admin | Updated: May 19, 2014 00:26 IST2014-05-19T00:24:44+5:302014-05-19T00:26:21+5:30
सांगली विधानसभा : मदन पाटील यांची तयारी सुरू सांगली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे नेते कोमात गेले असताना, सांगली विधानसभा मतदार संघात

लोकसभा पराभवानंतर काँग्रेसचे नेते सरसावले
सांगली विधानसभा : मदन पाटील यांची तयारी सुरू सांगली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे नेते कोमात गेले असताना, सांगली विधानसभा मतदार संघात मात्र निकालाच्या दुसर्यादिवशी वेगळेच चित्र पहायला मिळाले. काँग्रेसचे नेते, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत बैठक घेऊन नव्याने कामाला सुरुवात केली. तीन महिन्यानंतर होणार्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला पाटील यांनी आतापासून सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात प्रथमच भाजपने घवघवीत यश मिळविले. सर्वच विधानसभा मतदार संघात भाजपला मताधिक्य मिळाल्याने, काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक नेते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. या धक्क्यातून काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळी अजूनही सावरलेली दिसत नाहीत. पण त्याला अपवाद ठरले ते मदन पाटील! लोकसभेच्या निकालानंतर दुसर्यादिवशीच त्यांनी महापालिकेत तळ ठोकला. आचारसंहितेपूर्वी सत्ताधार्यांनी तब्बल ७० कोटीची कामे हाती घेतली होती. त्यांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या होत्या. पण आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना मुहूर्त लागू शकला नाही. त्यात रस्ते डांबरीकरण, खडीकरण, चरी बुजविण्याची सर्वाधिक कामे असल्याने ती पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रस्त्याची कामे होणार आहेत. त्यानंतर डांबराचे प्रकल्प बंद होतात. डांबरच उपलब्ध होत नसल्याने रस्त्याची कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनासमोर अवघे १५ दिवसच शिल्लक आहेत. पावसाळा संपण्यापूर्वीच विधानसभेचीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचा निधी असूनही कामे झाली नाहीत, तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच मदन पाटील यांनी लोकसभेचा पराभव जिव्हारी लागू न देता नव्याने फेरमांडणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या प्रशासनाचा मदन पाटील यांना दांडगा अनुभव आहे. नेत्यांचा दबाव असेल तरच प्रशासन हलते, अन्यथा नेहमीच कोमात गेलेले असते. त्यामुळे आतापासूनच प्रशासनाला जागे ठेवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी कामे रखडत ठेवण्यात पटाईत असलेल्या महापालिकेतील काही अधिकार्यांची भर बैठकीतही कानउघाडणी केली. कोणतीही कारणे न देता खड्डे बुजवा, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही, असा दमही त्यांनी भरला आहे. आता पाटील यांच्या दमबाजीचा प्रशासनावर काही परिणाम होतो का? हे लवकरच कळेल. (प्रतिनिधी)