घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोना काळात जार नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:40+5:302021-05-01T04:25:40+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयभीत वातावरण आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या व होणारे मृत्यू पाहून माणसे घाबरत आहेत. ...

Affordable plain water at home, but not a jar in Corona time! | घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोना काळात जार नको!

घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोना काळात जार नको!

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयभीत वातावरण आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या व होणारे मृत्यू पाहून माणसे घाबरत आहेत. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे तर नकोच परंतु बाहेरची वस्तूही घरात आणणे नको, असे म्हणून नागरिक सध्या जारचे पाणीसुद्धा घेण्यास भीत आहेत. गतवर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनाचे संकट आले होते. मात्र, त्या वेळेस नागरिकांनी कोरोनाची एवढी धास्ती घेतली नव्हती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र सर्वांनाच घाबरवून टाकले आहे. यंदाही मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना लाटेने जनजीवन ठप्प झाले आहे. जारच्या पाणी मागणीत ५० टक्केहून जास्त घट झाली आहे.

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. माणसे भीतीपोटी घराबाहेर पडत नाहीत. माणसे घरात जाण्यापूर्वी बाहेरच आंघोळ करीत आहेत. अशावेळी बाहेरून आणलेली वस्तू स्वच्छ धुऊन मगच घरात घेतली जात आहे. एरवी शुद्ध पाण्याचे जार उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विक्री होतात. परंतु, आता घरासमोर आलेले जार काेणीही घरात घेत नाहीत. हे जार वितरित करणारे वाहन अनेक ठिकाणी फिरून येत असल्याने त्यावर विषाणू तर नाहीत ना, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे अनेकांनी बाहेरचे पाणी बंद करून घरातल्याच पाण्याचा वापर सुरू केला आहे. तर काही जण नळाचे पाणी गरम करून ते पिण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे शहरातील शुद्ध पाणी विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या ठिकाणी वितरित होणारे पाणी आता बंद झाले आहे. सध्या महापालिका क्षेत्रात दिवसाला ८५ हजार लीटर शुद्ध पाण्याची विक्री होत आहे.

चौकट

- मार्च २०१९ : दिवसाला दीड लाख लीटर

- मार्च २०२० : दिवसाला ७० हजार लीटर

- मार्च २०२१ : दिवसाला ८५ हजार लीटर

चाैकट

महापालिकेकडे काही प्रकल्पांचीच नाेंद

महापालिका क्षेत्रात शुद्ध पाणी निर्मितीची ७० केंद्रे असली तरी अनधिकृत केंद्रे मात्र दीडशेहून अधिक आहेत. दरवर्षी या पाणी केंद्रांवरून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जार विक्री होते. मात्र, मागील वर्षीपासून हा व्यवसाय मंदावला आहे. महापालिकेने शहरातील एकाही अनधिकृत शुद्ध पाणी केंद्रावर कारवाई केली नाही. यामुळे शुद्ध पाणी केंद्रांचा व्यवसाय बिनधास्त सुरू आहे.

कोट

कोरोनाचा कहर पाहून खूप भीती वाटत आहे. बाहेरची कोणतीही वस्तू वापरत नाही. जारसुद्धा आम्ही बाहेरचा घेत नाही. घरातील पाणीच पिण्यासाठी वापरत आहोत.

- महादेव माने, सांगली

कोट

नळाचे पाणी गरम करून आम्ही ते पिण्यासाठी वापरत आहोत. यापूर्वी आम्ही जारचे पाणी विकत घेऊन पीत असू. मात्र, आता बाहेरून आलेल्या जारचे पाणी पिण्यास घरातले सर्वच नको म्हणत आहेत.

- शिवाजी पाटील, कुपवाड.

कोट

मागील वर्षभरापासून आमचा व्यवसाय मंदावला आहे. ऐन उन्हाळ्यात काेरोनामुळेे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे दुकाने बंद असून, नागरिक जारचे पाणी विकत घेण्यास तयार नाहीत.

- सदाशिव जाधव

Web Title: Affordable plain water at home, but not a jar in Corona time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.