संस्कृती जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:58+5:302021-09-25T04:27:58+5:30

कवठेएकंद : पुस्तकाचा संबंध मस्तकाशी असतो. मस्तक ठीक असले की नतमस्तक व्हावे लागत नाही. जगाच्या पाठीवर शिक्षणाला महत्त्व आहे. ...

The adoption of technology is necessary to preserve the culture | संस्कृती जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा

संस्कृती जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा

कवठेएकंद : पुस्तकाचा संबंध मस्तकाशी असतो. मस्तक ठीक असले की नतमस्तक व्हावे लागत नाही. जगाच्या पाठीवर शिक्षणाला महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीची जपणूक नव्या पिढीने केली पाहिजे. संस्कृती जपण्यासाठी आधुनिकता जोपासावी, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी येथे केले.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनी सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन, तैलचित्र अनावरण, वास्तू अर्पण सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शेकापच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील, डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या उपस्थितीत सुषमा पाटील स्मृती सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, खेड्यांचा विकास व्हायचा असेल तर शेती सुधारली पाहिजे. शेतीमध्ये तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी केला पाहिजे. शेतीत क्षारपड सुधारणेचा प्रश्न समोर येत आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कवठे एकंदच्या शेती व सामाजिक क्षेत्राने बरीच प्रगती केली आहे. सुषमा पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे. गावच्या लोकांनी केलेला सत्कार माझ्यासाठी मौलिक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी ‘कृषी पारायण’ संकल्पना शेटफळे या गावातून सुरू होत आहे. शासकीय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करा.

जयंत पाटील म्हणाले, गावं आता बदलू लागली आहेत. वाचनालयाने ही आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट यांसारख्या सोयी उपलब्ध कराव्यात. वाचन संस्कृती सुधारली पाहिजे. युवकांनी समाजकारणात सक्रिय व्हावे.

यावेळी देणगीदार विजयराव पाटील यांना गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाबूराव लगारे यांनी प्रास्ताविक केले. राजाराम माळी यांनी स्वागत केले. संदीप नागजे, संदीप कांबळे, जावेद जमादार यांनी सूत्रसंचालन केले. संजय थोरात यांनी आभार मानले.

Web Title: The adoption of technology is necessary to preserve the culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.