मिरज पूर्व भाग कर्नाटकास जोडा

By Admin | Updated: June 12, 2014 00:49 IST2014-06-12T00:48:00+5:302014-06-12T00:49:47+5:30

रस्तेप्रश्नी आंदोलकांची मागणी : आज गावे बंद; बहिष्काराचा इशारा

Add the eastern part of Miraj to Karnataka | मिरज पूर्व भाग कर्नाटकास जोडा

मिरज पूर्व भाग कर्नाटकास जोडा

मिरज : चांगले रस्ते व म्हैसाळ योजनेचे पाणी देऊ शकत नसाल, तर आम्हाला कर्नाटक राज्याशी जोडा, अशी मागणी आज (बुधवारी) मिरज पूर्वभागातील सलगरेचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी केली. मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. उपोषणास पाठिंबा म्हणून गुरुवारी पूर्वभागातील सर्व गावांत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे यांनी दिली.
मिरज पूर्वभागातील खराब रस्त्यांची दुरुस्ती व म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आमटवणे, खंडेराव जगताप, सलगरेचे तानाजी पाटील, बेळंकीचे वसंतराव गायकवाड, सोनीचे सरपंच दिनकर पाटील, लिंगनूरचे आर. आर. पाटील, रिपाइंचे अनिल कांबळे यांच्यासह पूर्वभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवारी उपोषणाच्या दुसऱ्यादिवशी पूर्व भागातील ग्रामस्थांनी आंदोलकांची भेट घेऊ न पाठिंबा दिला.
यावेळी सलगरेचे उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले की, मिरज-सलगरे रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हैसाळ योजनेचे पोटकालवे अपूर्ण असल्याने अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. महाराष्ट्रात राहून आम्हाला सोयी सुविधा मिळणार नसतील, तर पूर्वभाग कर्नाटकास जोडावा, अशी मागणीही तानाजी पाटील यांनी केली. आमटवणे म्हणाले की, रस्ते व पोटकालव्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पूर्वभागातील सर्व गावांत गुरुवारी बंद पाळण्यात येणार आहे. विजयनगरचे सरपंच राजू कोरे, अरुण कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Add the eastern part of Miraj to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.