मेणीजवळच्या दोन युवकांचा मुंबईत अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:58+5:302021-06-03T04:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) ...

मेणीजवळच्या दोन युवकांचा मुंबईत अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) येथील दोन माथाडी युवकांचे जागीच निधन झाले. ही घटना नाशिक रोडवरील वरई टोलनाक्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथील विक्रम राजाराम दीपक (वय ३२) व आटुगडेवाडी (मेणी) येथील रवींद्र ऊर्फ पप्पू सर्जेराव आटुगडे (२६, दोघेही सध्या रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) मुंबई येथील ट्रान्सपोर्टमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होते. सध्या त्यांची कामगार म्हणून नियुक्ती वसई (जि. ठाणे) येथे असल्याने ते मोटारसायकलवरून दररोज ये-जा करत होते. रोजच्या प्रमाणे ते कामावरून घरी कोपरखैरणे येथे येत असताना वरई टोलनाक्याजवळ पावसाने वाहून रस्त्यात आलेल्या चिखलात गाडी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दहाचाकी ट्रकने त्यांना जागीच चिरडल्याने मोठा रक्तस्राव होऊन जागीच निधन झाले.
विक्रम याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगा, दहा महिन्याची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रवींद्र आटुगडे याचे गेल्याच वर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दोघांचेही आईवडील गावी असतात. दोघांच्या अपघाती निधनाने सावंतवाडी आणि आटुगडेवाडी या गावांवर शोककळा पसरली आहे.