ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान
By Admin | Updated: November 2, 2015 00:38 IST2015-11-02T00:08:34+5:302015-11-02T00:38:12+5:30
तासगाव तालुक्यात ८४.९० टक्के, कवठेमहांकाळमध्ये ८९ टक्के, तर खानापूरमध्ये ७१.६० टक्के मतदान

ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान
सांगली : जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मोठ्या चुरशीने सरासरी ८२.९० टक्के मतदान पार पडले. पलूस तालुक्यात सरासरी ८६ टक्के, तासगाव तालुक्यात ८४.९० टक्के, कवठेमहांकाळमध्ये ८९ टक्के, तर खानापूरमध्ये ७१.६० टक्के मतदान झाले. पलूस तालुक्यातील रामानंदनगर व तासगाव तालुक्यातील सावळज येथे वादावादीचे प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अन्यत्र शांततेत प्रक्रिया पार पडली.
तासगाव तालुक्यात ३९ गावांत खऱ्याअर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीचे ‘टशन’ असल्याने या भागात मतदानासाठी चुरस दिसून आली. मतदारांना घरातून मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मतदारांना आणण्यासाठी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत जोरदार रस्सीखेचही सुरू होती. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून धावपळ आणि फोनवरून सातत्याने संपर्क सुरू होता. मांजर्डे, सावळज, बोरगाव, कवठेएकंद, येळावी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, पेड, हातनूर येथे मोठ्या चुरशीने, तसेच तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. काही गावांत किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.
उद्या मतमोजणी
जिल्ह्यात रविवारी झालेल्या ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची उद्या, मंगळवारी मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.