गॅस पंप बंद झाल्याने ७ हजार रिक्षाचालक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:21+5:302021-03-07T04:23:21+5:30
सांगली : सांगली शहरातील सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप अचानक बंद पडले असून एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ...

गॅस पंप बंद झाल्याने ७ हजार रिक्षाचालक चिंतेत
सांगली : सांगली शहरातील सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप अचानक बंद पडले असून एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ७ हजार रिक्षाचालकांना त्यामुळे त्रास होत आहे. हे पंप प्रशासनाने ताब्यात घेऊन सुरू करावेत किंवा पोलीस आणि एसटी पंपावर गॅसची सोय करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेटणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी सांगितले.
काटकर म्हणाले, पेट्रोलचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचा आधीच व्यवसाय कमी झाला आहे. मोठ्या प्रमाणावर रिक्षाचालक एलपीजी किट असणाऱ्या रिक्षा घेत आहेत. सांगली आणि मिरज शहर परिसरामध्ये पाच गॅस पंप सुरू झाल्यामुळे जवळपास सात हजार रिक्षाचालकांनी एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा खरेदी केल्या आहेत. मात्र, या पाचपैकी सांगलीवाडी आणि कोल्हापूर रोडवरील दोन गॅस पंप चालकांनी अचानकच बंद केले आहेत. आणखी एका पंपावर अनियमित पुरवठा असतो. त्यामुळे जुना कुपवाड रोड आणि मिरज रोडवरील एका पंपावर रिक्षाचालकांच्या रांगा लागत आहेत. त्याठिकाणी ताटकळत रहावे लागत आहे. ७ हजार चालकांच्या मागणीला हे दोन पंप पुरेसे नाहीत. त्यामुळे गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा मध्येच बंद पडत आहेत. सांगली आणि मिरज एसटी डेपोमध्ये तसेच पोलीस मुख्यालयात शासकीय पंपावर प्रशासनाने रिक्षाचालकांना गॅसची उपलब्धता करून दिली तर या दोन्ही शहरातील रिक्षाचालकांची चिंता कायमची मिटणार आहे. शिवाय त्याचा फायदा सरकारी पंपानाही होईल. दोन्ही शहरातील सात हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालकांचा असणारा हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटणार असून यावेळी रिक्षाचालकांनी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन गर्दी न करता निवडक रिक्षाचालकांनी शिष्टमंडळात भेटायला यावे असे आवाहन काटकर यांनी केले आहे.