इस्लामपुरात जोरदार पावसाने उद्योगांचे ७ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:35+5:302021-04-30T04:33:35+5:30
इस्लामपूरच्या औद्योगिक वसाहतीमधील आदिती पॅकिंग कारखान्यात पावसाचे पाणी घुसल्याने झालेले नुकसान. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील औद्योगिक वसाहत ...

इस्लामपुरात जोरदार पावसाने उद्योगांचे ७ लाखांचे नुकसान
इस्लामपूरच्या औद्योगिक वसाहतीमधील आदिती पॅकिंग कारखान्यात पावसाचे पाणी घुसल्याने झालेले नुकसान.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवारी रात्री वादळ वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरोगेटेड बॉक्स बनविणाऱ्या तीन कारखान्यात पाणी शिरून अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वळिवाच्या जोरदार पावसामुळे या परिसरातील गटारी तुंबल्याने हे सर्व पाणी तिन्ही कारखान्यांच्या गोदामात शिरल्याने हे मोठे नुकसान झाले आहे.
आदिती पॅकिंग इंडस्ट्रिज, वैशाली पॅकिंग इंडस्ट्रिज, ओम गुरुदेव पॅकर्स हे कोरोगेटेड बॉक्स बनविणारे उद्योग आहेत. या तिन्ही उद्योगांच्या आवारात आणि गोदामात मोठ्या प्रमाणात कोरोगेटेड बॉक्सचा तयार आणि कच्चा माल ठेवलेला असतो.
मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील सर्व गटारी तुंबल्या होत्या. त्यामुळे हे सर्व पाणी गोदामात आणि कार्यालयात शिरल्याने, तेथील कार्यालयीय दप्तर, पेपरचे बंडल व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उद्योजक दिनकरराव पाटील, मंगल पाटील, भगतसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी कामगारांच्या मदतीने वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसातही साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी धडपड केली. मात्र, तरीही अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले.