इस्लामपूरच्या संघावर ६३ लाखांची उधळपट्टी
By Admin | Updated: November 27, 2014 23:52 IST2014-11-27T23:06:36+5:302014-11-27T23:52:00+5:30
गंभीर ताशेरे : एकाच तालुक्यासाठी केला वेगळा करार

इस्लामपूरच्या संघावर ६३ लाखांची उधळपट्टी
अविनाश कोळी - सांगली-जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बचत गटांचे प्रभावीपणे काम सुरू असताना, केवळ एका वाळवा तालुक्यासाठी बचत गटांवर नियंत्रण व देखरेखीसाठी स्वतंत्र संस्था नियुक्त करण्यात आली. इस्लामपूर येथील वाळवा तालुका स्वयंसहाय्यता बचत गट सहकारी संघाशी याबाबतचा करार करून वेळोवेळी मानधन वाढीचे निर्णय घेऊन सात वर्षात तब्बल ६३ लाख ४७ हजार ६९ रुपये खर्च करण्यात आले. नाबार्ड तसेच प्रशासकीय टिपणीत यावर आक्षेप घेतल्यानंतरही तत्कालीन संचालक मंडळाने या रकमा संघास दिल्यामुळे लेखापरीक्षण अहवालात यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
जिल्हा बँकेच्या २८ मार्च २00५ रोजीच्या संचालक मंडळ बैठकीत वाळवा तालुका बचत गट संघाशी करार करण्याचा निर्णय घेतला. अन्य नऊ तालुक्यांमध्ये बचत गटांचे काम स्वयंप्रेरणेने व स्वयंनियंत्रणाने सुरू असताना, केवळ वाळवा तालुक्यासाठीच अशी संस्था नियुक्त करण्याची गरज कशी काय पडली?, असा सवाल उपस्थित झाला. बँकेकडील २६ जून २0१२ च्या टिपणीत म्हटले आहे की, ‘स्वयंसहाय्यता’ ही बचत गटाची मूलभूत व्याख्या आहे. यालाच छेद बसत असल्यामुळे बचत गटांनी स्वयंप्रेरणेने सर्व कामे पार पाडणे आवश्यक आहे. परंतु या करारामुळे बचत गटांची चळवळ परावलंबी होण्याचा धोका आहे. नाबार्डचाही या गोष्टीला आक्षेप आहे. बचत गटामध्ये वसुली ही एकमेकांच्या दबावाने होते. त्यामुळे अशा वेगळ्या संघामार्फत काम करणे, ही बाब बचत गटाच्या चळवळीस पूरक ठरत नाही.
वाळवा तालुका बचत गट संघाला प्रतिवर्षी सरासरी १0 लाख ८0 हजार इतकी मानधन स्वरुपातील रक्कम दिली जात असल्याचे अहवालात नमूद आहे. जिल्ह्यात बचत गटांचे वाळवा तालुक्याबरोबरच मिरज, शिराळा, तासगाव याठिकाणी चांगले कामकाज झाले आहे. त्यामुळे एकाच तालुक्याला असे मानधन दिले गेले. त्यामुळे जिल्ह्यात असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे करार केलेल्या इस्लामपुरातील संघाचे जिल्हा बँकेवरील अवलंबत्व संपुष्टात आणावे, असे टिपणीत म्हटले आहे.
बँकेने २00५ मध्ये संघाबरोबर करार केला होता. त्यानंतर प्रतिवर्षी नव्या कराराद्वारे २0१२ पर्यंत मुदतवाढी देऊन तसेच वेळोवेळी मानधन वाढीचा निर्णय घेऊन हा अनावश्यक खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च अनुत्पादक आहे. यावर वेळोवेळी नाबार्डने आक्षेप घेतले आहेत. कार्यालयीन टिपणीतही वारंवार याचा उल्लेख करूनही संचालक मंडळाने चुकीचे निर्णय घेतले.
संघाला दिलेल्या मानधनाचा तपशील.
वर्ष मानधन
२00५-0६६,७८,000
२00६-0७८,६६,0६९
२00७-0८१0,४६,000
२00८-0९१0,0२,000
२00९-१0१0,८0,५00
२0१0-१११0,२0,७00
२0११-१२६,५३,६00
या प्रकरणात निष्कर्ष काढताना चौकशी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, २00५ ते २0१२ पर्यंत खर्ची पडलेल्या ६३ लाख ४७ हजार ६९ रुपयांच्या नुकसानीस या कालावधीतील संचालक मंडळ व अधिकारी जबाबदार असून या रकमा व्याजासह वसूल करणे आवश्यक आहेत.