जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती होणार नव्या वर्षात ‘हायटेक’

By Admin | Updated: December 29, 2016 00:16 IST2016-12-29T00:16:01+5:302016-12-29T00:16:01+5:30

आधुनिकतेच्या वाटेवर : बॅँकिंगसह पंचवीस प्रकारच्या सुविधा मिळणार

537 Gram Panchayats in the district will be 'Hi-Tech' | जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती होणार नव्या वर्षात ‘हायटेक’

जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती होणार नव्या वर्षात ‘हायटेक’

अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी ५३७ ग्रामपंचायतींमधून दि. १ जानेवारीपासून बॅँकिंगसह टीव्ही व मोबाईल रिचार्ज, विमा हप्ता भरणे, रेल्वे व बसचे आरक्षण या सेवा आणि १९ प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. केंद्र, राज्य सरकार आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. शंभर टक्के ग्रामपंचायतीमध्ये कॅशलेस व्यवहार सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या. या निर्णयानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सामान्य माणसालाही कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटू लागले. केंद्र आणि राज्य सरकारने बहुतांश शासकीय कार्यालयांत कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. अर्थात अद्यापही अनेक शासकीय कार्यालयात कॅशलेस व्यवहार होत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने ‘आपलं सरकार सेवा केंद्र’ दि. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी ५३७ ग्रामपंचायतीत सुरू करण्यात येणार आहे.
यामध्ये ग्रामपंचायतींचा सर्वाधिक पुढाकार आहे. केंद्र शासनाचे सर्वसाधारण सुविधा महामंडळ (कॉमन सर्व्हिस सेंटर) या ग्रामपंचायतींना सर्व सहकार्य करणार आहे. अनेक ग्रामपंचायती दुर्गम भागात असल्यामुळे तेथे अखंडीत वीज आणि इंटरनेट सुविधा देण्यासाठी केंद्र शासनाने बीबीएनएल या संस्थेची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधा देण्याचे काम सुरू आहे. नव्या वर्षात म्हणजे दि. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींचा कारभार ‘हायटेक’ होणार आहे. तेथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती शासनाकडून करण्यात येणार आहे. त्याचे मानधन ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर गावामध्ये बँकिंगच्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. ग्राहकांचे बँक खाते उघडणे, पैसे भरून घेणे आणि पैसे काढण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. टीव्ही व मोबाईल रिचार्जही करता येणार आहे. गावातच विमान आणि रेल्वेचे आरक्षणही निश्चित करता येणार आहे. या सुविधांबरोबरच सात-बारा उतारा, उत्पन्न व रहिवासी दाखल्यांसह १९ प्रकारचे दाखलेही ग्रामपंचायतींमधून देण्यात येणार आहेत.
उत्पन्न वाढणार : रवींद्र आडसूळ
जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींमध्ये दि. १ जानेवारीपासून ‘आपलं सरकार सेवा केंद्र’ सुरु करण्यात येणार आहे. बॅँकिंगपासून सर्व सुविधा गावातील केंद्रामध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तसेच ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र आडसूळ यांनी दिली.
वीस ग्रामपंचायतीत कॅशलेस व्यवहार
आटपाडी तालुक्यातील दिघंची, घरनिकी, जत तालुक्यातील वज्रवाड, खोजानवाडी, कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, शिरसगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, हिंगणगाव, मिरज तालुक्यातील हरिपूर, लिंगनूर, शिराळा तालुक्यातील पणुंब्रेतर्फ वारुण, भाटवाडी, पलूस तालुक्यातील कुंडल, सुखवाडी, तासगाव तालुक्यातील सावळज, वायफळे, वाळवा तालुक्यातील शिरगाव, शिरटे, खानापूर तालुक्यातील पारे, नागेवाडी या वीस ग्रामपंचायतीत दोन दिवसात कॅशलेस व्यवहार सुरू होणार आहेत.

Web Title: 537 Gram Panchayats in the district will be 'Hi-Tech'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.