इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील दत्तमंदिराजवळ घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील १० हजारांची रोख रक्कम आणि दागिने अशा ५० हजारांच्या ऐवजाची चोरी केली. ही घटना सोमवारी (दि. १८) रात्री ते पहाटेदरम्यान घडली.
याबाबत प्रसाद दिलीप पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते कुटुंबासह राहतात. सोमवारी सकाळी ते कामानिमित्त इस्लामपूरला गेले होते. प्रसाद यांना इस्लामपूरमध्ये मुक्काम करावा लागल्याने घरी वडील एकटेच होते. रात्री सर्व दारांना कडी लावून वडील झोपी गेले.
सकाळी उठल्यावर दिलीप पवार यांना दरवाजाची कडी उचकटून उघडल्याचे दिसले. बेडरूममधील कपाट उघडे होते, कपडे अस्ताव्यस्त पडले होते. ही घटना त्यांनी मुलगा प्रसाद याला सांगितली. त्यांनी येऊन पाहिल्यावर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.