मनपाचे ५०० बदली कामगार कायम होणार
By Admin | Updated: August 28, 2014 23:04 IST2014-08-28T22:42:44+5:302014-08-28T23:04:50+5:30
तत्त्वत: मान्यता : प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांच्या सहीची !

मनपाचे ५०० बदली कामगार कायम होणार
सांगली : महापालिकेकडे गेली २५ वर्षे बदली कामगार म्हणून काम करणारे ५०० कर्मचारी लवकरच कायम होणार आहेत. पालिकेच्या प्रस्तावाला नगरविकास सचिवांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेला आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर सव्वा कोटीचा बोजा पडणार आहे.
नगरपालिकेपासून ५०८ बदली कामगार महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ, उपनगरांचा वाढता विस्तार यामुळे स्वच्छता व कचरा उठाव यंत्रणा अपुरी पडत आहे. रस्ते, गटारी, शौचालयांची स्वच्छता करताना सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार रस्त्यासाठी ९६०, गटार स्वच्छतेसाठी ३५५, तर शौचालयासाठी ५० अशी सुमारे १३६५ कामगारांची आवश्यकता आहे. सध्या ७५० कामगार कायम सेवेत आहेत. अद्याप किमान ६१५ कर्मचारी कमी पडतात. त्यातच गेल्या २० वर्षांपासून नव्याने नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने ५०८ बदली कामगार सफाईच्या कामासाठी घेतले होते. या बदली कामगारांना १९० रुपये दिवसाला मिळतात, तर कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना ३५० ते ४०० रुपये वेतन मिळत आहे. त्याशिवाय इतर सुविधाही दिल्या जातात.
या कामगारांनी सेवेत कायम करावे, यासाठी वेळोवेळी लढा दिला. चार वर्षांपूर्वी ५०८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव महापालिकेने करीत अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. पण शासनाने मध्यंतरी या प्रस्तावाला रेड सिग्नल दाखविला. पालिकेची आर्थिक स्थिती व आस्थापना खर्च जादा असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. पालिकेत काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पुन्हा या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. सध्या ५०८ कामगारांपैकी ११ जण मृत झाले आहे. त्यामुळे आता ४९७ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाणार आहे. अखेर नगरविकासचे उपसचिव प्रभाकर पवार, कक्ष अधिकारी आंबार्डेकर, उपकक्ष अधिकारी साने यांनी हा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेला असून, त्यांच्या सहीनंतर त्याला अंतिम रूप येणार आहे. या निर्णयामुळे गेली कित्येक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या सफाई कामगारांना न्याय मिळणार आहे. (प्रतिनिधी)