पांढऱ्या सोन्यास पाच कोटींचा फटका
By Admin | Updated: June 13, 2015 00:13 IST2015-06-12T23:47:31+5:302015-06-13T00:13:06+5:30
संकरित बीटी कॉटन वाण अद्याप भुईवरच : ३५० हेक्टरवरील लागवड वाया

पांढऱ्या सोन्यास पाच कोटींचा फटका
अविनाश बाड - आटपाडी -आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा पांढऱ्या सोन्याने डोळे पांढरे करण्याची वेळ आणली आहे. सुमारे ३५० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर उन्हाळ्यात थेंबन् थेंब पाण्याचा उपयोग करून लागवड केलेल्या संकरित कापसाच्या बीटी कॉटन वाणाने तीन महिने झाले तरी, भुई सोडलेली नाही. फुले, बोंडे न लागल्याने या भागातील शेतकऱ्यांना सुमारे पाच कोटींचा फटका बसला आहे.
आटपाडी तालुक्यात डाळिंबानंतर उन्हाळ्यात कापूस हेच शेतकऱ्यांसाठी नगदी पीक वरदान ठरलेले असताना यंदा तालुक्यावर पर्जन्यराजाने थोडी कृपा केली. मात्र पांढऱ्या सोन्याने घोर निराशा केली आहे. तालुक्यात वरलक्ष्मी आणि येलार ही वाणे आतापर्यंत शेतकरी वापरत होते. मात्र रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाला या जाती बळी पडत असल्याने शेतकरी कीडनाशके फवारून मेटाकुटीला येत होते. रोग व किडींचा प्रादुर्भाव न होणारी वाणे विकसित झाल्याने यंदा बीटी या वाणाची शेतकऱ्यांनी सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात लागवड केली आहे.
तीन महिन्यानंतर म्हणजे आता त्यांची पूर्ण वाढ होऊन प्रत्येक कापसाच्या झाडाला किमान १५० ते २५० फुले यायला हवी होती. आता प्रत्यक्षात काही झाडांना २-४, तर छोट्यांना काहीच फुले लागली नाहीत. शेतकऱ्यांना हे नगदी पीक असल्याने पेरणीपूर्व मशागत, बियाणे, शेणखत, रसायनिक खते, खुरपणी असा एकरी १० ते १५ हजार रूपये खर्च केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून चांगला कापूस आणि उत्पादन येण्यासाठी कापसाची लागवड केली आहे. पण शेतकऱ्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी टॅनिकचीही फवारणी केली आहे. पण त्याचा रोपांच्या वाढीसाठी कसलाही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन प्रसंगी व्याजाने पैसे काढून कापसासाठी घातलेले पैसेही आता एकाही शेतकऱ्याला कापसातून निघणार नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
सूर्याची अवकृपा की बोगस बियाणे?
हे बियाणे चांगले उगवून आले. त्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेबद्दल शंका घ्यायला वाव नाही. मात्र उगवणीनंतर सुमारे तीन आठवड्यापर्यंतच या कापसाच्या झाडांची वाढ झाली. त्यानंतर वाढ खुंटली. काही झाडे एकदम छोटी सहा इंचापर्यंत, तर काही फू ट-दीड फुटापर्यंत अशी असमान वाढली. यंदा एप्रिल मे, महिन्यात आटपाडी तालुक्यातील तापमान जास्त राहिले. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून चांगला कापूस आणि उत्पादन येण्यासाठी कापसाची लागवड केली आहे. पण शेतकऱ्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. काही शेतकऱ्यांनी अखेरचा उपाय म्हणून टॅनिकचीही फवारणी केली आहे. पण त्याचाही रोपांच्या वाढीसाठी कोणताही उपयोग झालेला नाही. आता जादा तापमानामुळे कापसाची वाढ झाली नाही आणि पूर्ण वाढ न झाल्यामुळे फुले, बोंडे आली नाहीत, का कापसाचे बियाणेच बोगस आहे, याची कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून चौकशी होण्याची गरज आहे.