तंबाखूजन्य पदार्थांची ४.५० कोटींची उलाढाल

By Admin | Updated: May 31, 2014 00:44 IST2014-05-31T00:43:06+5:302014-05-31T00:44:29+5:30

सांगली जिल्ह्यातील चित्र : तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक

4.50 crore turnover of tobacco products | तंबाखूजन्य पदार्थांची ४.५० कोटींची उलाढाल

तंबाखूजन्य पदार्थांची ४.५० कोटींची उलाढाल

नरेंद्र रानडे ल्ल सांगली तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगाला निमंत्रण मिळत असले तरी, जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या जाळ्यात गुरफटली आहे. सांगली जिल्ह्यात महिन्याला तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या सिगारेटस् आणि तंबाखूची विक्री होत असून शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू आदी तंबाखूजन्य पदार्थांची सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मागील काही महिन्यांपासून तंबाखूपेक्षा युवक वर्ग सिगारेटलाच पसंती देत आहे. भविष्यकाळात तंबाखूजन्य पदार्थांच्या जंजाळातून युवक वर्गाला बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी हातात हात घालून जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. भारतात तंबाखूचे आगमन सोळाव्या शतकात झाले. कोलंबसने अमेरिकेहून तंबाखू नामक वनस्पती भारतात आणली. यामध्ये अनेक विषारी पदार्थ असल्यामुळे तंबाखू सेवन आरोग्यास धोकादायक असते. तंबाखूचा पहिला बळी लिस्बनचा भारतातील राजदूत जॉन निकोट याचा गेला. त्यामुळेच तंबाखूमधील सर्वात विषारी द्रव्याला ‘निकोटिन’ हे नाव देण्यात आले. त्याकाळी केवळ तंबाखू हा एकमेव पदार्थ उपलब्ध होता. कालांतराने तंबाखूजन्य पदार्थांमध्ये वाढ होत गेली. यामध्ये विडी, सिगारेट, जर्दा, गुटखा, मशेरी, तपकीर, हुक्का पाईप, तंबाखूची पेस्ट यांचा समावेश होतो. वास्तविक तंबाखू ही वनस्पती कोणतेही जनावर खात नाही. परंतु आरोग्याचे अपरिमित नुकसान होते हे माहिती असूनही अनेकजण तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगात सुमारे ५० लाखांहून अधिक लोक तंबाखूच्या व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखूच्या व्यसनांमुळे पाचक रसांचे प्रमाण घटते, रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तोंडाचा कॅन्सर होतो. म्हणजेच तंबाखू सेवन करून आपण आपल्याच शरीराची हानी करीत असतो. बदलत चाललेली सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांसमोर असलेली नको ती आदर्श व्यक्तिमत्त्वे, ऐषोरामात जगण्याची लागलेली सवय, वाढती गरिबी यामुळे अनेकजण व्यसनांना जवळ करतात, परंतु तेच व्यसन त्यांचा जीव घेते. शासनाने केवळ कायदे करून काहीही उपयोग होणार नाही, तर लोकांची मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान आहे. सरकारने २००३ मध्ये गुटखाबंदीचे खंबीर पाऊल उचलले असले तरीही, सर्रास गुटखा उपलब्ध होतो. सांगली जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने छापे मारून आतापर्यंत कोट्यवधीचा गुटखा जप्त केला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या खपाला आळा घालायचा असेल, तर लोकशिक्षणाची गरज आहे. त्याचप्रमाणे शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर जास्त कर आकारणी केली, तर काही प्रमाणात त्यांचा खप कमी होईल.

Web Title: 4.50 crore turnover of tobacco products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.