सुंदरीची १७ तास मृत्यूशी झुंज व्यर्थ!
By Admin | Updated: May 24, 2016 00:52 IST2016-05-23T23:04:41+5:302016-05-24T00:52:50+5:30
कुत्र्यांचा हल्ला : आईचा आक्रोश; पालिकेच्या कारभाराविरुद्ध संताप

सुंदरीची १७ तास मृत्यूशी झुंज व्यर्थ!
सांगली : मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या सुंदरी परतेश भारती (वय ६ वर्षे, रा. सरस्वती कॉलनी, सांगली) या बालिकेचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तब्बल १७ तास तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण प्रचंड रक्तस्त्राव झाला असल्याने तिची झुंज व्यर्थ ठरली अन् तिची प्राणज्योत मालवली. चिमुरडीच्या या मृत्यूबद्दल सांगलीकरांनी हळहळ व्यक्त केली. महापालिकेच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त करुन मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सुंदरी भारती हिचे कुटुंब उत्तर प्रदेश राज्यातील नारायणपूर गावचे आहे. उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब सांगलीत स्थायिक झाले आहे. सुंदरीचे वडील सेंट्रींग कामावर जातात. हे कुटुंब उद्योग भवनच्या पिछाडीस सरस्वती कॉलनीत राहते. सुंदरी रविवारी सकाळी भावासोबत कॉलनीपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळाजवळील खड्ड्यात प्रातर्विधीसाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर सात ते आठ मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. हा प्रकार पाहून तिचा भाऊ भीतीने पळून गेला होता. तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
कुत्र्यांनी तिच्या शरीराचे २५ ठिकाणी लचके तोडल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. सायंकाळनंतर सुंदरीची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविले होते. आई, वडील, दोन भावंडे तिच्या उशाला बसून होती. सुंदरी रुग्णालयात दाखल झाल्यापासून निपचित पडली होती. ती आता उठेल, मग उठेल, या आशेने आई तिच्याकडे डोळे लावून बसली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनीही तिच्यावर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. वडील सातत्याने डॉक्टरांना हात जोडून उभे होते. मुलगी यातून वाचावी, यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली. मात्र रात्री पावणेबाराला तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
मदत मिळाली असती तर..?रेल्वे रुळाजवळ सकाळी फारशी वर्दळ नसते. सात ते आठ कुत्र्यांनी सुंदरीवर हल्ला केल्याने, तिचा प्रतिकार कुचकामी ठरला. शरीराचा कोणताही भाग सुरक्षित नव्हता. सगळीकडे लचके तोडलेल्या जखमा होत्या. लोक तिच्या मदतीला तातडीने धावून आले असते, तर कदाचित सुंदरी बचावली असती. तिला मदत मिळाली, पण फार उशिरा. त्यामुळे ती जगेल का नाही, याची सुरुवातीपासून साऱ्यांना
च शंका होती. अखेर ही शंका खरी ठरली.