टेंभू, ताकारी, म्हैसाळला हवेत १००० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:33+5:302021-03-04T04:50:33+5:30

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या ...

1000 crore in the air to Tembhu, Takari, Mahisal | टेंभू, ताकारी, म्हैसाळला हवेत १००० कोटी

टेंभू, ताकारी, म्हैसाळला हवेत १००० कोटी

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या कालावधीत झाली. ताकारी-म्हैसाळ योजनांची कामे सुरू होऊन ३७ वर्षे, तर टेंभूला २६ वर्षे झाली आहेत. तरीही तिन्ही योजनांची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. आजही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी जात नाही. मुख्य कालव्याची कामे पूर्ण झाल्यामुळे दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे, असा पाटबंधारे विभागाचा दावा आहे. ओढे, नाल्यांद्वारेच तलाव भरून दिले जात आहेत. पोट कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. सध्या बंदिस्त जलवाहिनीद्वारे थेट पाझर तलाव, शेत तलावामध्ये पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे.

टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी ४०० कोटी, तर ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ६०० कोटी अशा एक हजार कोटींच्या निधीची गरज आहे. यापैकी सध्या तातडीने टेंभूसाठी ३०० कोटी आणि ताकारी-म्हैसाळ योजनांसाठी ३५० कोटीची गरज आहे. या निधीची पाटबंधारे विभागाने राज्य शासनाकडे मागणी केली आहे.

कोट

म्हैसाळ योजनेची कामे शासनाने तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. नियमित पाणी मिळेल याची खात्री झाल्याशिवाय बागायती पीक घेता येत नाही. पोट कालव्यांची कामेही पूर्ण झाली पाहिजेत.

-महादेव पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याचेही काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. कालव्याचे अस्तरीकरण केलेले नाही. पोट कालव्यांची कामे तर कोठेच झालेली नाहीत. अपूर्ण कामे पूर्ण करून शासनाने दुष्काळी भागाला दिलासा द्यावा.

-सतीश मंडले, शेतकरी.

कोट

जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. शासनाने पाणी सोडण्याची आणि पाणीपट्टी वसुलीची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या पैशाचा हिशेबही शेतकऱ्यांना द्यावा.

-सुरेश पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या अपूर्ण कामांसाठी शासनाकडे साडेसहाशे कोटींची मागणी केली आहे. सध्या टेंभूचे १० टक्के तर ताकारी-म्हैसाळ योजनेचे १५ टक्के काम अपूर्ण आहे. येत्या वर्षभरात सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील.

-मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.

Web Title: 1000 crore in the air to Tembhu, Takari, Mahisal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.