(Image Credit : www.rd.com)
पत्नीची नेहमी तक्रार असते की, पती त्यांना वेळ देत नाहीत आणि तेच पतीची तक्रार असते की, पत्नी जास्त खर्च करते. तशा या तक्रारी फारच सामान्य आहेत. पण काही गोष्टी अशा असतात ज्या सांगणे आणि समजून घेणे दोन्ही गरजेच्या असतात. जेणेकरून नातं चांगलं रहावं. अशा अनेक तक्रारी असतात ज्या मनाच्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षे असतात, पण कधी सांगू शकत नाहीत किंवा असं म्हणूया की, संधी मिळत नाही. नात्यांमध्ये तक्रारी होणे सामान्य बाब आहे. खासकरून तेव्हा जेव्हा नातं आयुष्यभरासाठी असतं. अशात तक्रारी या दूर करण्यातच फायदा असतो. त्यासाठी तक्रार निट ऐकून घेणे महत्त्वाचे आहे.
भावना व्यक्त करा
काही वाईट वाटलं असेल आणि बोलण्यात अडचण येत असेल तर या स्थितीतून बाहेर पडा. बोलणं गरजेचं आहे. मनात साचवून ठेवाल तर रागात साचलेलं सगळं बाहेर पडेल. मनातलं सांगून टाकणं नात्याच्या मजबूतीसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा वेळेचा शोध घ्या जेव्हा तुम्हाला दोघांनाही पुरेसा वेळ असेल. दोघांचाही मूड शांत असेल अशी वेळ निवडा. बोलण्याची सुरूवात शांतपणे करा. सामान्य भाषेत जे सांगायचं ते सांगा.
काय करू नये - बोलण्याची सुरूवात करताच टिका, आरोप, चिडचिड करू नका. याने समोरची व्यक्ती एकतर निघून जाईल नाही तर संवाद वादात बदलेल. समोरच्याला हे वाटू देऊ नका की, तुम्ही त्याला दोष देताय, त्यांना असं वाटावं की, तुम्ही तुमच्या मनातलं त्याच्याशी बोलताय.
जे सांगायचं ते स्पष्ट सांगा
तुम्ही जेव्हा बोलण्याची सुरूवात करता आणि पार्टनरला सांगता की, तुम्हाला त्यांच्या वागण्याबाबत कसं वाटतं, तेव्हा यावेळी स्पष्ट बोला. त्या गोष्टींबाबत सांगा ज्या तुम्हाला खटकतात. जेणेकरून समोरच्याला समजून घेऊ शकेल आणि आपल्या वागण्यात बदल आणू शकेल.
काय करू नये - हवेत गोष्टी केल्याने काहीही फायदा होत नाही. जे काही बोलायचंय किंवा सांगायचंय ते स्पष्ट असावं. तुम्ही समोरच्यावर दोषरोप करताय असं वाटायला नको.
जे मनात आहे ते बोला
जर तुम्हाला वाटत असेल की, समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजू शकत नाही. तेव्हा मनातत्या मनात अंदाज बांधत बसण्यापेक्षा यावर मोकळेपणाने बोला. जर तुम्हाला वाटतं की, पतीने तुम्हाला वेळ द्यावा तर याबाबत त्यांना सांगा. पतीला जर वाटत असेल तर की, तुम्ही प्रत्येक गोष्टीतील लुडबूड कमी करावी किंवा प्रश्न कमी विचारावे तर या गोष्टीतही बदल व्हायला हवा. मनात जे आहे ते एकमेकांशी बोलणार नाही तर समस्येचं समाधान कसं निघणार? याचा विचार करा.
काय करू नये - मनात गैरसमज ठेवू नका. या गोष्टीची वाट बघू नका की, समोरची व्यक्ती बोलणं सुरू करेल. तक्रारींचा पेटारा जेवढ्या लवकर उघडाल तेवढ्या लवकर समस्या दूर होईल.
समस्या समजून घ्या
आता बोलणं सुरू झालंच आहे तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की, समस्या काय आहे. सोबतच हेही विचारा की, त्यांच्या वेगळ्या वागण्याचं कारण काय आहे. शांतपणे विचारलं तर तेही तुमच्यासमोर स्पष्टपणे बोलू शकतील. दोघांनीही समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे.
काय करू नये - समस्या जाणून घेताना प्रश्नांचा भडीमार करू नका. तसेच प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासाठी समोरच्याला वेळ द्या. लागोपाठ प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.