जिल्हा परिषदेचे व्यसनमुक्ती अभियान
By Admin | Updated: November 20, 2015 00:13 IST2015-11-19T21:16:16+5:302015-11-20T00:13:46+5:30
महिला सक्षमीकरण कार्यक्रम : समता वर्षात सामाजिक दृष्टीकोन

जिल्हा परिषदेचे व्यसनमुक्ती अभियान
रत्नागिरी : समता वर्षानिमित्त जिल्हा परिषद, रत्नागिरी आणि रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्यसनमुक्ती अभियान राबवणार आहेत. तसेच जिल्ह्यातील १००० महिलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
सन २०१५ हे समता वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय कामकाज करीत असताना सामाजिक दृष्टीकोन ठेवून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पावले उचलली आहेत. व्यसनाधीनतेमुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. समता वर्षानिमित्त हा उपक्रम हाती घेऊन व्यसनधीनतेबाबत जागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन शिबिरासाठी व्यसनमुक्ती जागृतीतून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. गर्भवती महिलांना लसीकरण, आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी, यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने व्हाईस एसएमएसची खास सोय केली आहे. या व्हाईस एसएमएसद्वारे गर्भवती महिलांना लसीकरण व आरोग्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर रमाई आंबेडकर महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील १००० महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी करणार आहे. अशा प्रकारे विविध उपक्रम राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी मारुती खडके यांच्याशी चर्चा केली असून, हे उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. हा जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रेरणा देशभ्रतार यांचे प्रयत्न सुरू आहेत. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात सुशिक्षितांसाठी स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रत्येक महिन्यात केले जाते. त्याचबरोबर जिल्ह्यात पाणी आडवा, पाणी जिरवा, या उपक्रमाखाली सुमारे १० हजार बंधारे उभारण्यात येत आहेत. हे करीत असतानाच समाजोपयोगी इतर उपक्रमही जिल्ह्यात राबवून जनतेला त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार रिलायन्सच्या सहाय्याने उपक्रम हाती घेत आहेत.