जिल्हा परिषदेच्या १५ जणांची चौकशी
By Admin | Updated: August 14, 2014 00:06 IST2014-08-13T23:52:27+5:302014-08-14T00:06:10+5:30
पेपरफुटी प्रकरणातील दोघांचा समावेश

जिल्हा परिषदेच्या १५ जणांची चौकशी
रत्नागिरी : सेवेत गैरप्रकार केलेल्या अकरा कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोकण विभागीय सहायक आयुक्तांकडून आज, बुधवारी जिल्हा परिषदेत विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेच्या गाजलेल्या पेपरफुटी प्रकरणातील राहुल पांडे व जयराम बिराजदार यांचाही समावेश होता.
जिल्हा परिषद परिचरपदाच्या परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील एका लॉजवर पेपरफुटी प्रकरणात आरोपींना रोख रकमेसह अटक केली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी परिचर जयराम बिराजदार आणि विस्तार अधिकारी (सांख्यिकी) राहुल पांडे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र, अद्याप यातील प्रमुख आरोपी कोण, हे स्पष्ट झालेले नाही. त्याची आज सहायक आयुक्त (चौकशी) यांनी म्हणणे नोंदवून घेतले.
पेपरफुटीखेरीज विविध गैरप्रकारांचा आरोप असलेल्या १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आज नोटीस बजावली होती. पद्माकर कुळकर्णी (कुष्ठतंत्रज्ञ), निजामुद्दीन मुर्तुझा पिरजादे (मिश्रक), हेमंत विभिषण दराडे (कनिष्ठ सहायक), चंद्रकांत वारघडे, भगीरथ नलावडे (दोन्ही तत्कालीन ग्रामसेवक), मारुती सूर्यवंशी, तेजश्री सुरेश खटावकर (दोन्ही ग्रामसेवक), चंद्रकांत पुजारी, अरविंद नागवेकर, जयसिंग कांबळे (दोन्ही तत्कालीन ग्रामविकास अधिकारी), राजेंद्र फणसे (कृषी अधिकारी) आणि संजय जानवलकर (विस्तार अधिकारी, कृषी) यांचा समावेश होता. (शहर वार्ताहर)