स्वत:ची कला जपत ‘आक्का’नं फुलवले बहिणींचे संसार

By Admin | Updated: October 15, 2015 00:39 IST2015-10-14T23:39:59+5:302015-10-15T00:39:36+5:30

अनुया बाम : वडिलांच्या निधनानंतर बहिणींसाठी त्याच झाल्या पिता--नारीशक्तीला सलाम

The world of sisters 'flowers' | स्वत:ची कला जपत ‘आक्का’नं फुलवले बहिणींचे संसार

स्वत:ची कला जपत ‘आक्का’नं फुलवले बहिणींचे संसार

रत्नागिरी : वडिलांच्या पश्चात पाच बहिणींची लग्न करताना ‘आक्का’नं आपल्यातील अभिनेत्री हरवू दिली नाही. कधी या अभिनेत्रीने त्यांना साथ दिली, तर त्यांनी आपल्यातील अभिनेत्रीला! म्हणून तर आपल्या बहिणींचे संसार मार्गी लावतानाच त्यांनी ४० वर्षात तब्बल तीन हजारांहून अधिक नाटकांमध्ये काम केलं आणि बड्याबड्या कलाकारांकडून कौतुकाची थाप मिळवली. स्वत:ची आवड जपतानाच ‘आक्का’ असण्याचं कर्तव्य निभावणंही त्या विसरल्या नाहीत. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुनीता बापट अर्थातच आत्ताच्या अनुया बाम. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी वयाच्या १४व्या वर्षी त्या आरसा शील्डच्या स्पर्धेत ‘अबोल झालीस का’ या एकांकिकेत अगदी आयत्यावेळी नर्स झाल्या. अंगभूत सभाधीटपणा, उत्तम संभाषणकौशल्याच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेतून अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर दोन वर्षांनी ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं.रत्नागिरीतील अलंकर थिएटर्स, याचबरोबर एस. टी., सार्वजनिक बांधकाम, भू विकास इ. खात्यांच्या नाटकातून राज्य नाट्य स्पर्धेसाठी सुमारे १४ वर्षे त्यांनी अभिनय तर केलाच; पण अनेकदा या स्पर्धांतून मानाचं समजलं जाणारं अभिनयाचं रौप्य पदकही मिळवलं.वडील विनायक बापट यांच्याकडून जशी अभिनयाची आवड आली तशीच आई सरस्वती बापट यांच्याकडून गोड गाता गळाही मिळाला. ज्याचा उपयोग त्यांना मत्स्यगंधा, सं. सौभद्र, जय जय गौरी शंकर इ. संगीत नाटकांमध्ये त्यांना करता आला. अभिनयाइतकीच त्यांच्या गाण्यांनाही प्रेक्षकांकडून दाद मिळू लागली.
अभिनयाची वाटचाल सुरु असतानाच त्यांच्या लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात वडिलांचं अर्धांगवायूमुळे निधन झालं आणि धाकट्या पाच बहिणी व आईची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. ही जबाबदारी पेलण्यासाठी या अभिनय कलेनेच त्यांना साथ दिली. महिन्यातील सलग २५/२६ दिवस रोज एक नाटक करत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून धाकट्या सर्व बहिणींचे शिक्षण, लग्न आदी जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या.
नटी या शब्दाला सुनीतातार्इंनी आपल्या चोख अभिनयाबरोबरच चोख वागण्यातून एक मान मिळवून दिला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आज त्यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे ३००० नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. आकाशवाणीवरील मुक्ताकाश, ५०-५०, सूर्यस्पर्श, रथचक्र, लंडनची आजीबाई आदी श्रुतिकांमुळे त्यांचा आवाज ही त्यांची वेगळी ओळख बनली. दिल्लीत आकाशवाणी नाट्य स्पर्धेत परिवर्तनम् या संस्कृत नाटकासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला.
एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला समजून घेऊ शकतो, हे त्यांचे पती अवधूत बाम यांच्यावरून समजतं. संसारिक जबाबदारी पेलतानाच पत्नीच्या कलेत मोलाचं सहकार्य त्यांनी नेहमीच दिलं. अवधूत बाम हे स्वत: आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक, वादक, संगीतकार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भजन आणि कीर्तन क्षेत्रातील सुनीतातार्इंची वाटचाल सुरु आहे. रत्नागिरीतल्या कर्लासारख्या छोट्याशा गावात राहून ४० वर्षांची ही वाटचाल आई-वडील, बहिणी आणि लग्नानंतर खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पतीमुळेच, असं त्या आवर्जून नमूद करतात. (प्रतिनिधी)


आपल्या वाटचालीत आलेले अनुभव हेच त्यांचे गुरु बनले आणि त्या गुरुच्या आशीर्वादामुळेच प्र. ल. मयेकर, मधुकर तोरडमल, जयवंत दळवी अशा मान्यवरांची कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली. पेट्रोमॅक्सच्या रंगमंचावर सुरु केलेली अभिनयाची वाटचाल फिरत्या रंगमंचापर्यंत पोहोचली ती प्रभाकर पणशीकरांसारख्या अभिनयातील बाप माणसाच्या तो मी नव्हेच या नाटकामुळे. कोकण आणि गोव्याच्या दौऱ्यात सुनंदा दातार ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली.


विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नाटक हे माध्यम जपतानाच सुनीतातार्इंनी क्राईम डायरीसारखी ई टीव्हीवरील मालिका, रमाबाई आंबेडकर, बे एके बेसारखे चित्रपट, जीवन बिमा निगमसाठी डॉक्युमेंट्री ही अभिनय क्षेत्रातली वेगवेगळी माध्यमंही हाताळली. या प्रदीर्घ वाटचालीनंतर आता राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीची परीक्षिका म्हणून काम करण्याचा मानही त्यांनी पटकावला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी मोहोर उठवून वेगळेपण सिध्द केले आहे.

कलाकाराचं ‘देण्या’चंही भान
कलाकारानं घेण्याबरोबर देण्याचंही व्रत जोपासायला हवं, हे ध्यानात ठेवत अनुया बाम यांनी गरजूंची राहण्याची मोफत सोय, रुग्णांना जेवण देणं, रूग्णांच्या नातेवाईकांना मदत करणे अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. समाजकार्याच्या कामाची पावती म्हणजे त्यांची कर्ला ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी झालेली निवड. नाशिक, चिपळूण, रत्नागिरी येथील विविध संस्थांनी त्यांच्या या कामाची रंगभूमीवरील सेवेची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. निवेदिका म्हणूनही आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. सावळे परब्रह्म, देवाचिये द्वारी, शिवतनया विघ्नेशा, हरि भजनाचा मेळा आदी सिडीसाठी त्यांनी निवेदन केलं आहे.

Web Title: The world of sisters 'flowers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.