‘हक्काच्या जमिनीत आम्हीच उपरे’
By Admin | Updated: October 15, 2015 00:36 IST2015-10-14T23:45:11+5:302015-10-15T00:36:50+5:30
व्याघ्र प्रकल्प : गोठणेतील ग्रामस्थ अजूनही वाऱ्यावरच!

‘हक्काच्या जमिनीत आम्हीच उपरे’
सचिन मोहिते -- देवरुख--व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गोठणेवासीयांना पुनर्वसनाच्या ठिकाणी साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला तरी देखील या पुनर्वासितांसमोर मुलभूत गरजांपासून वंचित राहण्याची वेळ उभी ठाकली आहे. आजपर्यंत जमिनीचं नावावर न झाल्याने पक्के घर बांधणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ना घर, ना वीज, ना पाणी, ना सुयोग्य रस्ते अशा अनेक समस्यांच्या गर्तेत चाचपडत असलेले गोठणेवासीय आजही ऊन -वारा - पाऊस यांचा सामना करत वाऱ्यावरच आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकत आहेत.व्याघ्र प्रकल्पाकरिता गोठणेवासीयांची जमीन गेल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. तत्पूर्वीर् गोठणे गावात शेवटची ग्रामसभा २४ मे २०१२ रोजी घेण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी २५ मे २०१२ हे गोठणेवासीय विस्थापित झाले. सरकारने त्यांना पुनर्वसनासाठी जागा दिली. तीन ठिकाणी हे गावकरी स्थलांतरीत झाले. त्यातील संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावठाण या नदीकिनारी असलेल्या जागेमध्ये ८५ कुटुंबे दाखल झाली तर अन्य कुटुंबे दाणोली व जैतापूर या ठिकाणी गेली. हातीव गावठाण या ठिकाणी शासनाने ८५ कुटुंबांना त्यांच्या नावावर जागा करुन सातबारा त्यांचे नावे करुन देणे गरजेचे होते. मात्र, साडेतीन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून देखील पुनर्वसन आणि महसूल विभाग रत्नागिरी यांच्याकडून आजपर्यंत ही प्रक्रीयाच पूर्ण होऊ शकली नसल्याने या पुनर्वसितांना ऊन, वारा, पाऊस आणि जंगलमय भागाचा सामना करत वाऱ्यावरच तात्पुरत्या झोपड्या बांधून जीवन कंठण्याची वेळ आली आहे.
शासनाकडून आधी पुनर्वसन मगच प्रकल्प अशी भूमिका घेतली जाते. मात्र, २०१३ सप्टेंबर दरम्यान ए, बी, सी अशी अंतर्गत प्लॉटींगची कार्यवाही अंतिम टप्प्यात होती. तरीही सप्टेंबर २०१५ म्हणजेच दोन वर्षे होऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण का होऊ शकली नाही हा संशोधनाचा भाग झाला आहे.
सन २०१३च्या दरम्यान लाईटची सुविधा निर्माण करण्यासाठी केवळ पोलच उभे केले होते तर नळपाणी करता पाईपलाईन टाकणे बाकी होते. या साऱ्या कामाकरिता निधी उपलब्ध नसल्याने हे काम थांबले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने या प्रश्नाला वाचा फोडली होती आणि आज विजेचे खांब टाकून वाहिनी ओढून झाली आहे. मात्र, पाणी आलेच नाही तर विजेची तयारी होऊन देखील पक्की घरे नसल्याने विद्युत जोडणी देणार कशी, असा प्रश्न आहे.
सध्या हातीव गावठाण भागात जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. या मार्गाचा विचार केला तर आज येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. आज गोठणे पुनर्वसन भागात म्हणजे हातीव गावठाण येथे विद्युतीकरणाकरिता खांब, विद्युत वाहिन्या ओढून झाल्या आहेत. तर नळपाणी योजनेचे काम देखील बहुतांश प्रमाणात झाले आहे. मात्र, याचा लाभ अद्यापही प्रकल्पग्रस्तांना मिळू शकलेला नाही. शासनाने जमीन संपादीत करताना प्रकल्पग्रस्तांना विविध आमिषे दाखवली. मात्र, त्यानंतर एकही आश्वासन पूर्ण केले नाही. स्वत:च्या हक्काची जागा असतानाही ती नावावर करण्यात न आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पायपीट : डोक्यावरचा हंडा अजून तसाच
सध्या विहिरीद्वारे नळपाणी योजनेची पाईपलाईन रस्त्याच्या गटारातून टाकली असून, या नळपाणी योजनेवर लाखोंचा खर्च झाला आहे. हातीव गावठाण येथे पुनर्वसन झालेल्या कुटुंबातील महिला आणि मुलींच्या डोक्यावरचा हंडा अजून तसाच आहे. दररोज मैलभर अंतर पायी तुडवून पाणी भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आमच्या आयुष्यातील समस्यांचा अंधार केव्हा संपणार असा आर्त सवाल करत प्रशासन आमच्या, अं:धकारमय जीवनात सुविधांचा प्रकाश निर्माण केव्हा करणार, असे अनेक प्रश्न गोठणेतील ग्रामस्थ करत आहेत.
पुनर्वसन प्रक्रियेबाबत तेथील ज्येष्ठ ग्रामस्थांशी संवाद साधला असता ते म्हणाले, जमिनी आमच्या नावावर झाल्या तर पुढील घरबांधणी, विद्युत जोडणी घेणे, नळपाणी घेणे हे प्रश्न सुटू शकतील. मात्र, पुनर्वसन प्रक्रिया विशेषत्वाने आणि जलद होणे गरजेचे आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
- पांडुरंग पवार, लक्ष्मण पवार,
ज्येष्ठ ग्रामस्थ.
असून अडचण नसून खोळंबा
जोपर्यंत प्लॉटींग होऊन जमिनी नावावर होत नाहीत तोपर्यंत हे ग्रामस्थ पक्क्या घराची तयारीच करु शकत नाहीत. सध्या काहींनी चिरा, वाळू दोन वर्षांपूर्वीपासून आणून ठेवला आहे. मात्र, अत्यंत धिम्या गतीने चाललेल्या या प्रक्रियेमुळे हक्काच्या सोयी सुविधांपासून गोठणेवासीयांना उपेक्षीत रहावे लागत आहे. ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.