नोंदणी केलेल्यांनाच लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:28+5:302021-05-05T04:51:28+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ३२ हजार व्यक्तींना कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यासाठी पाच ...

नोंदणी केलेल्यांनाच लस
रत्नागिरी : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ३२ हजार व्यक्तींना कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यासाठी पाच हजार डोस प्राप्त झाले असून, त्यापैकी पहिल्या दिवशी ८०० जणांना लस देण्यात आली आहे. मात्र, ही लस ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ज्यांना वेळ, तारीख दिलेली आहे, त्यांनाच यापुढेही लस देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबईत शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय कदम उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले जिल्ह्याला १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी ५ हजार डोस पहिल्या टप्प्यात मिळाले असून ट्रायल बेसवर ते दिले जात आहेत. अधिक साठा उपलब्ध होताच प्रत्येक तालुक्यात केंद्रे उभारण्यात येतील. तसेच सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तीसाठी लसीकरण केंद्रे बंद होत आली आहेत. मात्र, याबाबत आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी बोलणं झालं आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत हाही साठा येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचे परिणाम आपण बघतच आहोत, त्यादृष्टीने जिल्ह्यात आणखी पाच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. यात पाली, रायपाटण, लांजा, संगमेश्वर आणि मंडणगड यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पाच नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये विद्युत दाहिनी उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिका यांना अत्यावश्यक रुग्णांसाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना ऑक्सिजनचा कोटा नक्की मिळेल. त्यासाठी त्यांना कुठल्या रुग्णांसाठी गरज आहे, त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे कळवावी लागेल. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू, असेही ते म्हणाले.
सध्या बाहेरून येणाऱ्यांना थेट होम आयसोलेशन किंवा होम क्वाॅरंटाइनमध्ये पाठविणे म्हणजे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढविण्यासारखे आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे मंत्री सामंंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांच्या हातावर यापुढे निवडणुकीसारखी शाई लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.