चिपळूण (जि.रत्नागिरी) : उद्धवसेनेचे कोकणातील एकमेव नेते आमदार भास्कर जाधव यांनी नुकतेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, पक्षाच्या पडत्या काळात विरोधकांवर तुटून पडणाऱ्या या नेत्याच्या संभाव्य निवृत्तीने उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.गेली ३५ ते ४० वर्षे आमदार भास्कर जाधव हे सक्रिय राजकारणात आहेत. आता राजकारणात थांबावेसे वाटते, अशी भूमिका त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली. त्यांचे हे विधान पक्षांतर्गत नाराजीतून आले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षांतर्गत आपले विरोधक, विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहीर करण्यास झालेला उशीर, नाव जाहीर झाल्यानंतरही त्याला होत असलेला विलंब याबाबत त्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आमदार जाधव यांनी ‘थांबण्या’चा मुद्दा काढल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
'ती' खंत अजूनही मनात कायम राहिली
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. मात्र, मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची खंत आजही त्यांच्या मनात आहे. त्यांनी ती बोलूनही दाखविली आहे.
भास्कर जाधव यांचे स्पष्टीकरण
- मी नाराज असल्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. माझ्या मनात नसलेल्या गोष्टींवर मी खुलासा करत नाही.
- पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मी भाषण केलं, त्यात कुठेही नाराजीचा लवलेश दिसला का? मी कशाला नाराज होईन?
- मी आधी कृती करतो, मग बोलतो. यावेळीही मी स्वतःहून पुढे येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घेतली आहे. ही माझी निष्ठा आणि पक्षनिष्ठा दर्शविणारी कृती आहे.
- सहा वेळा निवडून आल्यानंतर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे, पण अजूनही माझ्यात संघर्ष करण्याची ताकद आहे.