बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:28+5:302021-07-03T04:20:28+5:30
मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे अखेर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...

बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे अखेर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र, अद्याप निकालाबाबत मूल्यमापन कसे करणार, गुणदानासाठी कोणती पद्धती अवलंबिणार याबाबत काहीच निर्णय नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
सीबीएसईने बारावीचे मूल्यमापन करताना दहावीचे ३०, अकरावीचे ३० व बारावीचे ४० गुण याप्रमाणे मूल्यमापन करून गुणदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्ष गांभीर्याने घेत नसल्यामुळे केवळ पास होण्यापुरता अभ्यास करतात. त्यामुळे अकरावीच्या वर्षाचे मूल्यमापन केले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाप्रमाणे दहावीच्या वर्षातील गुणही विचारात घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातून १८ हजार ८५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरले होते. शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थी सरसकट पास होणार असले तरी मूल्यमापनाबाबत कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही. सीबीएसईप्रमाणेच मूल्यमापन करण्यात येऊन गुणदान व्हावे, अन्यथा गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका आहे.
- अकरावीचा निकाल दोनशे गुणांच्या आधारे लावण्यात येतो. दोन घटक चाचणीचे प्रत्येकी २५ गुण, सहामाई परीक्षेतील ५० व वार्षिक परीक्षेच्या १०० गुणांचा समावेश आहे.
- गतवर्षी वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यामुळे दोन घटक चाचणी व सहामाई परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
बारावीला अंतर्गत गुण काेठे असतात?
- बारावीसाठी कला, वाणिज्य, शाखेअंतर्गत तोंडी परीक्षा अथवा प्रकल्पासाठी २० गुण असतात.
- विज्ञान शाखेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तीस गुण असतात. यावर्षी प्रथम सत्र ऑनलाईनच होते. तोंडी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या तरी प्रात्यक्षिक परीक्षा घेताच आल्याच नाहीत.
शासनाने प्रत्यक्ष परीक्षा कोरोनामुळे घेणे शक्य नसल्याचे कारण देत बारावीच्या परीक्षा ऐनवेळी रद्द केल्या. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होऊन महिना झाला तरी अद्याप निकालाबाबत मूल्यमापन व गुणदान याबाबत काहीच निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. लवकरात लवकर याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.
- अलफिया पटेल, विद्यार्थिनी.
बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत शासनाने उशिरा निर्णय घेतला; परंतु आता गुणदानासाठी मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी नेमका कोणता निकष लावला जाणार याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करूनच मूल्यमापन केले जावे. नुकसान करू नये एवढीच अपेक्षा.
- दुर्वेश जायदे, विद्यार्थी
कोरोनामुळे अकरावीची वार्षिक परीक्षा प्रत्यक्ष घेणे शक्य नसल्यामुळे रद्द करण्यात आली. बारावीतील अंतर्गत परीक्षा झालेल्या नाहीत. मूल्यमापनाचे सूत्रही निश्चित झालेले नाही. मूल्यमापनात अकरावीतील ४० टक्के गुणांचा विचार झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणदानावर परिणाम होण्याचा धोका आहे.
दहावीमध्ये गुणवत्ता यादीत स्थान बळकावणारे विद्यार्थी अकरावीमध्ये पास होण्यापुरते अभ्यास करतात. मात्र, अकरावीतच त्यांची बारावीची तयारी सुरू असते. त्यामुळे अकरावीचे गुणावर बारावी निकालासाठी मूल्यमापन करण्यात आले, तर मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.
- एस. व्ही. पाटील, प्राचार्य माँसाहेब मीनाताई ठाकरे कनिष्ष्ठ महाविद्यालय, नेवरे.
बारावीचा निकाल तयार करताना दहावी, अकरावीच्या वर्गातील गुणांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर मात्र अकरावीत गुण कमी असणाऱ्या मुलांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे दहावी, अकरावी व बारावीच्या वर्गानुसार मूल्यमापन व्हावे.
- डाॅ. पी. पी. कुलकर्णी, प्राचार्य, गोगटे जोगळेकर महाविद्यालय.
अकरावी तर ‘रेस्ट इयर’
- महाविद्यालयीन शिक्षणामध्ये प्रवेशाचा पहिला टप्पा अकरावीला मानला जातो. दहावीच्या वर्गात वर्षभर अभ्यासासाठी ताणतणाव सोसला जातो. दहावी पास झाल्यानंतर अकरावीत प्रवेश करतात.
- उच्च शिक्षणाच्यादृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण मानले जाते. कित्येक विद्यार्थी अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इअर’ मानतात. यावर्षी बारावीची तयारी करीत असतानाच अकरावी पास होण्यापुरतेच महत्त्व देतात.