तीन आत्महत्यांनी खेड तालुका हळहळला...
By Admin | Updated: December 23, 2014 00:53 IST2014-12-23T00:49:09+5:302014-12-23T00:53:43+5:30
दोघांच्या आत्महत्येमागचे कारण उलगडू शकलेले नाही

तीन आत्महत्यांनी खेड तालुका हळहळला...
खेड : रविवार आणि सोमवारी गळफासाच्या घडलेल्या तीन घटनांनी खेड तालुका हादरून गेला आहे. यापैकी एकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे, तर अन्य दोघांच्या आत्महत्येमागचे कारण उलगडू शकलेले नाही.
खेड तालुक्यात आत्महत्येचे प्रकार वाढत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत तिघांनी केलेल्या आत्महत्येने खेडमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या तिन्ही आत्महत्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तिघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तालुक्यातील घेरापालगड येथील राववाडी येथे राहणाऱ्या शिवराम देहू गोगावले (८३) यांनी आपल्या वृध्दापकाळ आणि आजाराला कंटाळून घराच्या छताच्या लाकडी भाळाला दोरी बांधून गळफास घेतला. रविवारी दुपारी १.३० वाजता ही घटना घडली़
धामणंद गावठाण येथे राहणारे गोविंद गणपत पालांडे (६७) यांनी आपल्या राहत्या घराच्या मंडपाच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता ही घटना घडली.
खेड तालुक्यातील चिंचवली रेवेचीवाडी येथे राहणारे प्रदीप पांडुरंग जाधव (३०) यांनीही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)