तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:39+5:302021-07-03T04:20:39+5:30
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी झाराप-कुडाळ येथील एल ॲण्ड टी कंपनीच्या गोडाऊनमधून तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी तिघांच्या मुसक्या ...

तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी तिघांना अटक
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी झाराप-कुडाळ येथील एल ॲण्ड टी कंपनीच्या गोडाऊनमधून तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी दाेघांना रत्नागिरीतील दांडेआडम येथून तर एकाला कुडाळमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या दाेघांना कुडाळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या चाेरीप्रकरणी कंपनीचे विनायक महादेव काेंडेकर (रा. काेल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. काेकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. हे काम एल ॲण्ड टी कंपनीकडे देण्यात आले असून, या कामासाठी वापरण्यात येणारी १५०० किलाे वजनाची सुमारे ८ लाख २५ हजार ६३३ रुपयांची तांब्याची तार चाेरीला गेली हाेती. याप्रकरणी कुडाळ पाेलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी फुरखान सिराजुद्दीन मलिक (२०, रा. उत्तर प्रदेश) आणि सूर्यकांत बसंतकुमार पानी (२८, रा. ओडिसा) या दाेघांना ताब्यात घेतले आहे. झाराप येथून ही तार चाेरून ती रत्नागिरीत आणून ठेवण्यात आली हाेती. याबाबत पाेलिसांना माहिती मिळताच ही तार तेथून मिरजाेळे येथील सुभानंद पाटील यांच्या दांडेआडम येथील फार्म हाऊसच्या परिसरात नकळत ठेवली हाेती. पाेलिसांच्या खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळल्यानंतर पाेलिसांनी तपास सुरू केला. याची माहिती मिळाल्यानंतर त्या जागेवरून ही तार दुसरीकडे नेत असताना ग्रामीण पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील केबलही जप्त करण्यात आली असून, संशयितांना पुढील तपासासाठी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला कुडाळमधूनच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आणि पोलीस कर्मचारी संतोष कांबळे, वैभव मोरे, संदीप काशीद, विनोद भितळे, अमित कदम यांनी केली.
—————————————
टीप मिळाली अन् चाेरी उघड
तांब्याच्या तारेची चाेरी झाल्याची घटना झाराप येथे घडली असून, तेथेच गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. या चाेरीबाबत अन्य काेणत्याच पाेलीस स्थानकांना माहिती नव्हती. मात्र, रत्नागिरीतील ग्रामीण पाेलिसांना खबऱ्याकडून टीप मिळाली आणि पाेलिसांनी चाेरट्यांच्या मुसक्या आवळल्या. ग्रामीण पाेलिसांनी स्वत:हून या चाेरीचा छडा लावला.