मठ येथे दोन गटात वाद, गावात तणाव
By Admin | Updated: August 30, 2015 22:46 IST2015-08-30T22:46:04+5:302015-08-30T22:46:04+5:30
पोलिसांनी आज घडलेल्या घटनेवर रितसर तक्रार दाखल करुन योग्य ती कारवाई दोघांवरही केली जाईल, असे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झाले. सा

मठ येथे दोन गटात वाद, गावात तणाव
लांजा : गेली अनेक वर्षे देवळावरून वाद निर्माण झालेले असताना गावविरोधी असलेल्या पार्टीने हॉटेलचे साहित्य देवळात ठेवल्याचे पाहून गावकऱ्यांनी ते बाहेर फेकून दिल्याने दोन पार्टीत वाद निर्माण होऊन त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. अशाचवेळी मठ गावातील शेकडो ग्रामस्थ या घटनेविरोधात मोठ्या संख्येने जमल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी पोलिसांनी दोन्ही पार्टीला पोलीस स्थानकात आणून त्यांच्या विरोधात कारवाईचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
मठ गावातील श्री भवानी सोमेश्वर आणि जाकादेवी या मंदिरावरून संपूर्ण गाव विरूध्द एक व्यक्ती असा गेली १२ वर्षे वाद चालू आहे. अनेकवेळा या विषयावरून लांजा पोलीस स्थानकामध्ये परस्परविरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या. मात्र, हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्याने यावर शांततेसाठी पोलीस काही ना काही तोडगा काढत. दरम्यान शनिवारी येथे रुपे लावली. कारण या देवळाचा एक्का सोमवारी असल्याने साफसफाईचे काम सुरू होते. याच अनुषंगाने जाकादेवीच्या देवळातही नारळ देण्याचे ग्रामस्थांनी ठरवले होते. मात्र, या देवळात विरोधी पार्टी असलेल्यांनी आपल्या हॉटेलचे साहित्य देवळात ठेवल्याचे आढळून आले. त्यावेळी ग्रामस्थांनी ते बाहेर फेकून दिले. त्यावरून वादाला सुरुवात झाली.
साहित्य बाहेर फेकल्याचे पाहून गावविरोधी पार्टी असलेल्या शैलेश अनंत लिंगायत याने ग्रामस्थांना शिव्या देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात एक सोड्याची बाटली देवळाच्या बाजूने फेकण्यात आली. मात्र, त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शैलेश याच्या हॉटेल मधीलच बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. यामध्ये शैलेश याच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली. हॉटेलात गिऱ्हाईक म्हणून आलेल्या विकास कांबळे यांच्या नाकाला दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. देवळावरून वाद निर्माण झाल्याचे वृत्त मठ गावात समजताच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीसपाटलांनी याबाबतची खबर लांजा पोलीस स्थानकाला दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना पोलीस स्थानकात आणले. गावपार्टीच्या काही मोजक्याच लोकांना पोलीस स्थानकामध्ये बोलावले असताना मठचे शेकडो लोक स्थानकात जमा झाले. पोलीस निरीक्षक एच. आर. डंगारे यांनी परिस्थितीचे भान ठेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी याच देवळाबाबत धर्मादाय आयुक्तांनी निर्णय गावाच्या बाजूने दिला असल्याचे सांगितले. विरोधी पार्टीने आपण याबाबत अपिल केले असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी आज घडलेल्या घटनेवर रितसर तक्रार दाखल करुन योग्य ती कारवाई दोघांवरही केली जाईल, असे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झाले. सायंकाळी उशिरापर्यंत जबाब दाखल करण्याचे काम सुरु होते. (प्रतिनिधी)