आपत्तीच्या वेळी ‘त्यां’चे पोलिसांना सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:59+5:302021-07-03T04:20:59+5:30
रत्नागिरी : घाटात झालेला अपघात असो किंवा नदीत बुडालेली व्यक्ती असो, अशा आपत्तीत मृतांना शोधण्याचे अवघड काम बावनदी पंचक्रोशीतील ...

आपत्तीच्या वेळी ‘त्यां’चे पोलिसांना सहकार्य
रत्नागिरी : घाटात झालेला अपघात असो किंवा नदीत बुडालेली व्यक्ती असो, अशा आपत्तीत मृतांना शोधण्याचे अवघड काम बावनदी पंचक्रोशीतील सुमारे २२ ते २५ कार्यकर्ते निवळी बौद्धवाडीतील रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे करत आहेत. काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झालेल्या विनायक गीते यांचाही मृतदेह या कार्यकर्त्यांनी अवघ्या दीड ते दोन तासात शोधून काढून पोलीस यंत्रणेला सहकार्य केले.
रमेश सावंत, संजय खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही टीम गेल्या अनेक वर्षांपासून तळमळीने हे काम करत आहे. कुठेही अपघात झाला असेल आणि त्या अपघातात अडकलेल्या व्यक्ती किंवा अडकलेलेे मृतदेह काढण्यासाठी पोलिसांची किंवा अन्य नागरिकांची मदतीची हाक देताच धावून जाते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या भयानक अपघातातील तसेच भरलेल्या नदीत वाहून गेलेले आणि अवघड ठिकाणी अडकलेले असंख्य मृतदेह शोधून काढून पोलिसांच्या तपासकार्यात मदत केली आहे. या पथकात करबुडे, बावनदी निवळी, तळेकांटे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच सप्तलिंगी नदीत विनायक गीते यांनी भरलेल्या नदीत उडी घेतली. दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांनी रमेश सावंत यांच्या या पथकाचे सहकार्य घेतले आणि अवघ्या दीड तासात गीते यांचा मृतदेह रमेश सावंत, संजय खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश खापरे, संजू सावंत, प्रमोद खापरे, मंगेश भरणकर, पिंटू शिर्के, सागर शिर्के, प्रशांत शिर्के, करबुडे पोलीस पाटील, ओमकार खापरे, प्रमोद रेवाळे, रामदास सावंत, विश्वास नितोरे, राजू खापरे, रोहन रेवाळे यांनी शोधून काढला. यापूर्वीही या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यात शीळ धरण, वेरळ, लांजा, वडगाव धरण आदी ठिकाणी पोलिसांना मृतदेह शोधून देण्यात सहकार्य केले आहे. यासाठी या कार्यकर्त्यांना रमेश सावंत यांनी प्रात्यक्षिके देऊन तयार केले आहे. तसेच भरलेल्या नदीत प्रशिक्षण देताना ते त्यांची सुरक्षितताही पाहतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा लांजा पोलिसांनी सत्कारही केला आहे.
................
निवळी धबधबा येथे काही वर्षांपूर्वी ॲड. शिवप्रसाद महाजनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. यावेळीही या पथकाने अडचणीच्या ठिकाणी असलेले त्यांचे मृतदेह शोधून काढले. यापूर्वी आंबेनळी येथील घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात होऊन सर्वच व्यक्ती मृत झाल्या होत्या. या अवघड घाटात कोसळलेल्या या बसमधील व्यक्तींचे मृतदेह या स्वयंसेवकांनी मोठ्या शर्थीने शोधून काढले होते. यापूर्वी आंबेनळी येथील घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात होऊन सर्वच व्यक्ती मृत झाल्या होत्या. या अवघड घाटात कोसळलेल्या या बसमधील व्यक्तींचे मृतदेह या स्वयंसेवकांनी मोठ्या शर्थीने शोधून काढले होते.
.......................................
गाडीचा अपघात किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर अशांचे मृतदेह काढताना पोलिसांची खरी कसरत असते. अशाठिकाणी ते पाण्यात उतरू शकत नाहीत. त्यामुळे अशा अडचणीच्यावेळी आमच्या पथकाला अगदी कुठच्याही वेळी बोलावले तरीही कुठल्याही मोबदल्याची वाट न पाहता आम्ही मदतीला धावून जातो. यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना याबाबत प्रशिक्षणही देत असतो.
- रमेश सावंत, निवळी बौद्धवाडी (ता. रत्नागिरी)