कामांमुळे शिक्षक हतबल
By Admin | Updated: October 15, 2015 00:46 IST2015-10-14T23:40:59+5:302015-10-15T00:46:32+5:30
दापोली तालुका : अशैक्षणिक कामांचा बोजा

कामांमुळे शिक्षक हतबल
दापोली : शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असा शासननिर्णय असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी जूंपले जात असल्याने शिक्षकवर्गात कमालीची नाराजी आहे. विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत असल्याने पालकांमधून शासनाच्या या धोरणाविरूध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक जनगणना आणि आपत्कालीन व्यवस्थापन सारखी कामे वगळून शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये असा शासननिर्णय आहे. शिक्षकाने जास्तीतजास्त वेळ अध्यापनाला दिल्याने यातून सक्षम भावी पिढी घडेल. सन २०२०पर्यंत भारत महासत्ता करण्याच्या दृष्टीने उचलेलेले महत्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात होते. हा निर्णय होऊनही सरल प्रणालीच्या नोंदी, आमआदमी विमा योजनेचे अर्ज भरून घेणे ते आॅनलाईन अपलोड करणे, विद्यार्थ्यांचे शाळा स्तरावर जातीचे, उत्पन्नाचे वास्तव्याचे दाखला मागणी अर्ज भरून घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत पथनाट्य, जनजागृती फेरी विविध स्पर्धा घेऊन ग्रामस्थांना सजग करणे, गावातील शौचालयांची संख्या मोजून प्रत्येक शिक्षकांवर सोपवलेल्या कुटुंबाचा पाठपुरावा करणे, पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नदी ओढ्यांना किमान १० बंधारे बांधणे या आणि अशा प्रकारच्या विविध कामांना शिक्षकांना जुंपले जात आहे.
शाळा विद्यालयामधील भरतीवर असणाऱ्या बंदीमुळे कमी कर्मचारी असतानाही शासनाकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी होणारी शिक्षकांची ससेहोलपट पाहता शैक्षणिक गुणवत्तेचा टक्का घटण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. सरल प्रणाली, आमआदमी योजना, पायाभूत चाचणी गुण ही माहिती संगणकावर आॅनलाईन भरण्याची सक्ती आहे. सरल प्रणालीची माहिती शाळेच्या बाहेर भरल्यास कठोर कारवाईचे आदेश देताना जिल्ह्यातील ७५ टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही तर ५० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा शासनाने पुरवलेली नाही या गोष्टींकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे.
महिना अखेर होणारी सहामाही परीक्षा, १० वी १२ वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे, सहामाहीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अशा जबाबदाऱ्या कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळांना पूर्ण कराव्या लागत आहेत. शाळेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती परीक्षा, सहशालेय उपक्रम क्रीडा स्पर्धा यांच्याकडे लक्ष पुरवण्यासाठी शिक्षक शाळेच्या वेळेपूर्वी येतात व शाळा सुटल्यानंतरही जादा वेळ काम करतात.
यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा भार शिक्षकांवरच सोपवला जात असल्याने शिक्षकांच्या या समस्या सोडवायला आणि भावी विद्यार्थी पिढीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावे लागणार असेच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण विभाग : प्रश्नपत्रिकाच दिलेल्या नाहीत
पायाभूत चाचणीचे नियोजन देऊन चाचणीचा प्रत्यक्ष दिवस उजाडला तरी तोंडी परीक्षांचे तर काही ठिकाणी लेखी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाच दिलेल्या नाहीत. काही ठिकाणी शाळांनाच झेरॉक्स काढायला सांगून त्यांना आर्थिक भूर्दंड देण्याचा प्रकार घडल्याने शासनाच्या धोरणांबाबत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.
कारवाईचे दाखवले भय
प्रत्येक कामाला वेळेचे बंधन देऊन कारवाईचे भय दाखवून शिक्षकांना काम करण्यास भाग पाडले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर याचा परिणाम होण्याच्या शक्यतेने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.