तालुके नऊ, बंब फक्त सहाच..

By Admin | Updated: February 1, 2015 00:48 IST2015-02-01T00:48:31+5:302015-02-01T00:48:31+5:30

दखलपात्र विषय बेदखल : लांजा, गुहागर, मंडणगडची सुरक्षा ऐरणीवर

Taluks nine, only six bombs .. | तालुके नऊ, बंब फक्त सहाच..

तालुके नऊ, बंब फक्त सहाच..

रत्नागिरी : जिल्ह्यात नऊ तालुके असले, तर आपत्कालीन संकटाच्या निवारणासाठी शासकीय अग्निशमन बंबांची संख्या केवळ सहाच आहे. पाच नगरपरिषदांकडेच सहा बंब असून, संगमेश्वर, लांजा, मंडणगड, गुहागर हे तालुके या सुविधेपासून वंचितच आहेत. यावरून आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा सुरक्षितेबाबत बेदखल असल्याचे दिसून येत आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे हा विषय पुन्हा एकदा पुढे आला आहे. मात्र जिल्ह्यातील उदासीन राजकीय लोकप्रतिनिधींना अजूनही या विषयाचे गांभीर्य समजलेले नाही. आगीची घटना घडल्यानंतर त्यावर चर्चा होते. पण पुढे कोणतीच हालचाल होत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार वेगाने होत आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या शहरांचाही विस्तार वेगाने होत आहे. आजूबाजुचा परिसरही विकसित होत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी आणि चिपळूणनजीक लोटे येथे औद्योगिक वसाहतही विस्तारलेली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. उन्हाळ्यात वणव्यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. यातून होणारे नुकसानही काही वेळा लक्षणीय असते. रत्नागिरी शहरात रासायनिक उद्योगांचे प्रमाण नगण्य असले, तरी लोटे एम. आय. डी. सी. भागात रासायनिक कारखाने आहेत. यापूर्वी काही भागात तसेच महामार्गावर आगीच्या तसेच वायू गळतीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, या आपत्कालीन घटनांचा सामना करण्यासाठी आवश्यक तेवढी अग्निशमन बंबाची संख्या नसल्याने अनेकदा भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण या चार नगरपरिषदा आणि दापोली नगरपंचायतीकडे स्वत:ची अग्निशामक यंत्रणा कार्यरत आहे. चिपळूणला दोन अग्निशमन बंब आहेत. मात्र, ही यंत्रणा पुरेशी नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले. संगमेश्वर, लांजा, गुहागर आणि मंडणगड या तालुक्यांकडे तर ही यंत्रणाच नाही. आपत्कालीन परिस्थितीत नजिकच्या तालुक्याचा आधार घेऊन बंबाची मागणी करावी लागते. यासाठी वेळही बराच लागतो.
शहराच्या विस्ताराबरोबरच विकासाचीही प्रक्रिया होत असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत केवळ एकच बंब अपुरा पडतो. परिणामी अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खासगी कंपन्यांच्या सुरक्षायंत्रणेचा आधार घ्यावा लागतो. रत्नागिरी परिसरात अशी घटना घडल्यास नजीकच्या फिनोलेक्स व जिंदाल कंपनीच्या बंबांची गरज भासते. चिपळूणातही काही वेळा नगरपरिषदेचे दोन बंब अपुरे पडतात. त्यामुळे, येथील एमआयडीसी आणि खासगी कंपन्यांकडील अग्निशमन यंत्रणेचा आधार घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Taluks nine, only six bombs ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.