फळझाड लागवड योजना सुरु
By Admin | Updated: August 27, 2015 23:39 IST2015-08-27T23:39:09+5:302015-08-27T23:39:09+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : शासनाने मान्यता दिल्याने समाधान

फळझाड लागवड योजना सुरु
शिवाजी गोरे -दापोली आघाडी सरकारच्या काळात बंद झालेली रोजगार हमी फळझाड लागवड योजना नव्या सरकारने पुन्हा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवडीद्वारे फळविकासाची योजना सन २०१५-१६ मध्ये पुढे चालू ठेवण्याची शासनाने मान्यता दिल्याने फळझाड लागवड शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीत राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत फळझाड लागवड योजना राबवण्यात आली होती. अगदी सुरुवातीच्या काळात या योजनेला शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. परंतु त्यानंतर मात्र राज्याचा लक्षांक कमी करण्यात आला. गेल्या दोन वर्षात तर या योजनेकडे सरकारने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे २०१४ मध्ये ही योजनाच बंद होती. परंतु या योजनेला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून महायुतीच्या सरकारने योजना पुन्हा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५-१६ या वर्षाकरिता सात हजार हेक्टर क्षेत्रावर फळझाड लागवडीचे उद्दिष्ट राज्याला घालून दिले आहे.महाराष्ट्रात फळवृक्ष लागवडीला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्याची आर्थिक प्रगती व पडीक जमिनीचा विकास या हेतूने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड कार्यक्रम सन २०१५-१६ या चालू वर्षात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली कलमे, रोपे शासकीय रोपवाटिका, कृषी विद्यापीठ रोपवाटिका, शेती महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र व राज्यातील खासगी नोंदणीकृत रोपवाटिका यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावयाची आहेत. लवकरच संचालक (फलोत्पादन) कृषी आयुक्तालय सर्व संबंधितांना रोपाचे नियोजन व वितरणाचे आदेश निर्गमित करतील, असे सांगण्यात आले.
जिल्हानिहाय लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय सर्व संबंधितांना रोपाचे नियोजन व वितरण आदेश निर्गमित करतील, असेही सांगण्यात आले. जिल्हानिहाय लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
फळझाड लागवड योजना योग्य रितीने राबवण्यासाठी कालबद्ध वेळापत्रकानुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण विभागासाठी ३० सप्टेंबर, उर्वरित विभागासाठी ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत लागवड करण्यात यावी, अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत.
अनुदानप्राप्त लागवड
कोरडवाहू पिके - आंबा, काजू, बोर, सीताफळ, आवडाळ, चिंच, फणस, कोकम, जांभूळ, कवठ, चारोळी, जौजोबा, बांबू. बागायती पिके - नारळ, संत्रा, मोसंबी, चिकू, डाळींब, पेरु, अंजीर, कागदी लिंबू, सुपारी, तेलताड, रबर. औषधी व सुगंधी वनस्पती - आईनर, अर्जुन, असन, अशोका बेल गुग्गुळ, लोध्रा, रक्तचंदन, शिवण, टेटू, बेहडा, बिब्बा, डिकेमाली, हिरडा, रिठा, वावडिंग, करंज, पानपिपरी. मसाला पिके - मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी.