टपाल कर्मचारी २ रोजी संपावर
By Admin | Updated: August 30, 2015 00:33 IST2015-08-30T00:31:06+5:302015-08-30T00:33:42+5:30
विविध मागण्या : केेंद्र शासनाच्या धोरणावर केली टीका

टपाल कर्मचारी २ रोजी संपावर
रत्नागिरी : टपाल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २ सप्टेंबरला लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईजने जाहीर केले आहे.
सध्याच्या सरकारने कामगारविरोधी व जनविरोधी धोरणांचा तडाखा सुरू केला आहे. कामगारांनी संघर्ष करून मिळविलेल्या संघटनात्मक तरतुदी, पगार, सामाजिक न्याय आदींबाबत सरकारने विरोधी भुमिका स्वीकारली आहे. यामुळे भांडवलदारांना सरकारचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप पोस्टल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. सत्तेवर आल्यानंतर सरकार अच्छे दिन आयेंगे, महागाई कमी करू , रोजगार निर्मिती करू ही सर्व आश्वासने विसरले आहे. महागाईचा आलेखही चढता असल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवीन पेन्शन योजना अडचणीची आहे. मात्र, त्यात बदल करण्यास सरकार तयार नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्याचे विलीनीकरण, अंतरीम वाढ, सातवे पे कमिशन सन २०१४पासून लागू करण्यास सरकारने नकार दर्शविला आहे.
डाक विभागाने तसेच सरकारने ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांचा सातव्या पे कमिशनमध्ये समावेश केलेला नाही. त्यामुळे आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दि. २ सप्टेंबर रोजी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे.
हा संप सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी यशस्वी करून दाखवावा, असे आवाहन नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन अँड ग्रुपचे सचिव व्ही. एस. लिंगायत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)