आंबा घाटातील दरड काढण्याचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST2021-07-27T04:33:29+5:302021-07-27T04:33:29+5:30
साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरड काढण्याचे काम गेल्या पाच दिवसांत केवळ चाळीस टक्केच झाले आहे. ...

आंबा घाटातील दरड काढण्याचे काम संथगतीने
साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरड काढण्याचे काम गेल्या पाच दिवसांत केवळ चाळीस टक्केच झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शक्य तिथे दिवसरात्र काम करून एकेरी वाहतुकीसाठी तरी घाट सुरू करण्यात यावा, अशी मागणी हाेत आहे.
दरड काढण्यासोबत वजरे खिंडीलगत खचलेल्या रस्त्याचे बांधकाम करण्यास गती देणे गरजेचे आहे, तरच येथून अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होईल. सन २०१९ मध्ये याच खिंडीत नव्याने उभारलेल्या काँक्रीटच्या भिंती पहिल्याच पावसात खचल्या होत्या. त्याच्या पुढील वळणावर आता सत्तर फुटांचा रस्ता मध्यभागातून खचला आहे. खचलेल्या ठिकाणी दरीत सुमारे दोनशे फुटावर घळ पडल्याने खचलेला रस्ता उभारणीचे मोठे आव्हान आहे. गेल्या महिन्यात या ठिकाणाहून ट्रक दरीत कोसळून अपघात झाला होता तेव्हा बाजूपट्टी व ग्रिल निसटले होते. त्याच ठिकाणी आता निम्मा रस्ता तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली आहे.
----------------------------
रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावर आंबा घाटातील वजरे खिंडीजवळ रस्ता खचलेला आहे.