वडिलांपाठोपाठ सहा दिवसांनी आईचाही कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:34+5:302021-05-05T04:51:34+5:30
राजापूर : कोरोना संकटाचा काळ सर्वांसाठीच अत्यंत कठीण असा काळ आहे. अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधारच हरपत ...

वडिलांपाठोपाठ सहा दिवसांनी आईचाही कोरोनामुळे मृत्यू
राजापूर : कोरोना संकटाचा काळ सर्वांसाठीच अत्यंत कठीण असा काळ आहे. अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधारच हरपत आहे. अशाच प्रकारे राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथील गादीकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झालेला असतानाच अवघ्या सहा दिवसांनी आईचाही मृत्यू झाल्याने गादीकर परिवार पोरका झाला आहे.
मंदरूळ गावातील सामाजिक कार्यकर्ते गणपत भालचंद्र गादीकर (७०) यांचे २६ मे रोजी, तर त्यांच्या पत्नी शारदा गणपत गादीकर (६३) यांचे अवघ्या सहा दिवसांनी १ मे रोजी निधन झाले आहे. आई-वडिलांच्या निधनामुळे गादीकर कुटुंबीय पोरके झाले आहे. पत्रकार संदीप गादीकर यांच्यावर हा दुदैवी प्रसंग ओढवला आहे.
राजापूर तालुक्यातील पेंडखळे, पन्हळेतर्फे राजापूर यासारखे गाव कोरोना हॉटस्पाट ठरत आहेत. तर मंदरूळ गावातही अशाच प्रकारे कोरोनाने शिरकाव करत अशा प्रकारे बळी घेतले आहेत. गणपत गादीकर यांना ताप आला होता. तात्काळ संदीप याने त्यांच्यावर उपचार सुरू केले. कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना लांजा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. २६ मे रोजी वडिलांची तब्येत अचानक खालावली आणि सकाळी ६ वाजता त्यांचा लांजा येथील खासगी रुग्णालात मृत्यू झाला. ही बातमी रायाटण येथे उपचार घेत असलेल्या आईला समजली तर तिला धक्का बसेल म्हणून त्यांनी याबाबत आईला काहीच सांगितले नाही. मात्र त्यानंतर नियमित फोन करणाऱ्या पतीचा फोन न आल्याने व मुलांचीही भेट होत नसल्याने आई काहीशी अस्वस्थ झाली व तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे मग संदीप यांनी आईला अधिक उपचारासाठी तात्काळ रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमालीची खालावल्याने व उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने १ मे रोजी सकाळी आईनेही प्राण सोडला. त्यांच्या पश्चात संदीप व प्रसादसह एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.