अजित गोरुले यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:48+5:302021-05-05T04:51:48+5:30
संदीप माळवदेचे यश देवरुख : येथील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे याने प्रथम ...

अजित गोरुले यांची निवड
संदीप माळवदेचे यश
देवरुख : येथील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रमेश गोपाळ यांनी द्वितीय, अर्चना मांगले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सृजल टाकळे, माधुरी जोशी, वैष्णवी पारकर, अशोक रनवरे आदींना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.
डांबरीकरण मागणीला यश
रत्नागिरी : डोर्ले खोतमळा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. मागणीला यश आले असून रस्ता डांबरीकरणासाठी जनसुविधेंतर्गत साडेतीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.
रस्ता दुरुस्तीची प्रतीक्षाच
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील रस्ते निकृष्ट झाले आहेत. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थी, पालकात संभ्रम
रत्नागिरी : शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत; मात्र याबाबत अद्याप तारखा व वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या सूचनेकडे लक्ष लागून राहिले आहे.
विक्रेत्यांवर संक्रांत
रत्नागिरी : कोकणी मेवा महामार्गावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. आंबे, काजूसह, फणस, करवंदे, जांभळे, जाम विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वत्र शांतता आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
माकडांचा उपद्रव
रत्नागिरी : तालुक्यातील टेभ्ये, चांदेराई, हरचेरी परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. नारळी, आंबा बागायतीसह भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत. काैलारू घरात शिरुन अन्नपदार्थ खाऊन फस्त करीत आहेत. ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
फळांना मागणी
रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, कलिंगड तसेच आंब्यासाठी मागणी होत आहे. रविवारी फळांसाठी मागणी आणखी वाढणार असल्याने विक्रेत्यांनी आधीच स्टाॅक जमा केला आहे.
भूमिगत वाहिनीच्या कामाला वेग
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत आडी ते परटवणे तसेच शहरातील काही भागात भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. सध्या परटवणे ते गांजुर्डे पर्यंत काम जोरात सुरू असल्याने वाहन चालकांना वाहन खबरदारी घेत चालवावे लागत आहे. लाॅकडाऊनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने कामाला गती प्राप्त झाली आहे.
मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
रत्नागिरी : शासनाने कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा तर रद्द केल्या आहेत. अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. शासनाने याबाबत स्पष्ट सूचना जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत आहे.