टंचाईकृती आराखड्यात८ गावामधील २६ वाड्या
By Admin | Updated: February 24, 2016 00:04 IST2016-02-24T00:04:01+5:302016-02-24T00:04:01+5:30
राजापूर तालुका : २ लाख २० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित

टंचाईकृती आराखड्यात८ गावामधील २६ वाड्या
राजापूर : आगामी काळात भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर पंचायत समितीकडून राजापूरचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये ८ गावांसह २६ वाड्यांचा समावेश आहे. यासाठी २ लाख २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
या गावांमध्ये ताम्हाणे गावातील चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, मोरोशीमधील तळेवाडी, मिरासवाडी, टेंबवाडी, गावकरवाडी, खरवतेतील धनगरवाडी, हसोळतर्फ सौंदळमधील कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, कारवलीतील विठ्ठलवाडी, गाववाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी, वरचीवाडी, दसवंतवाडी, झर्येतील पळसमकरवाडी, धनगरवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी, तळवडेतील बामणदेव धनगरवाडी, साखरीनाटेतील बलबले मोहल्ला यांचा समावेश आहे. या गावांसह अंतर्गत वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे, त्यासाठी २ लाख २० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
राजापूर तालुक्यात जलशिवार योजनेंतर्गत निवड झालेली पाच गावे व त्यामधील १८ वाड्या यांचादेखील संभाव्य पाणीटंचाईमध्ये समावेश करण्यात आल्याने जलशिवार योजनेतून जी कामे मार्गी लागली, असा जो डंका पिटला गेला, त्यालाच तडा गेला असल्याचे आता समोर आले आहे.
भरमसाठ खर्च करूनही जलशिवारयुक्त योजनेची कोणती कामे मार्गी लागली, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत, तर जी गावे व वाड्या संभाव्य टंचाईत समावेश करण्यात आल्या आहेत. नेमके त्याच गावात किंवा त्या लगतच्या गावातच धरण प्रकल्प आहेत. ही बाबदेखील दुर्लक्षून चालणारी नाही. त्यामुळेच मागील एक दशकाच्या कालखंडात नेमकी हीच गावे व त्यामधील वाड्यांना दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो, हेच वास्तव पुढे आले. (प्रतिनिधी)
योजनेबाबत साशंकता : जलशिवार योजनेतील गावांचाही समावेश
जिल्हा परिषदेकडून जलशिवार योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही योजना यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राजापूर तालुक्यात जलशिवार योजनेतील गावांचा संभाव्य पाणीटंचाईत समावेश करण्यात आल्याने योजनेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.