सव्वालाख तिजोरीत
By Admin | Updated: November 9, 2015 23:41 IST2015-11-09T21:06:22+5:302015-11-09T23:41:02+5:30
वाहतूक पोलीस : ९५३ वाहनचालकांवर कारवाई

सव्वालाख तिजोरीत
चिपळूण : शहरात वाहतूक पोलिसांनी आपली ठोस कारवाई सुरुच ठेवली असून, गेल्या काही दिवसात ९५३ जणांकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी या काळात चिपळूण बाजारपेठेत शिवाजी चौक ते बाजारपेठ दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असते. एरव्हीही या भागात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी होत असते. परंतु, वाहतूक पोलीस चौकी कार्यरत झाल्यापासून या भागातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.ऐन दिवाळी सणाच्या काळातही या भागात वाहतूक सुरळीत सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध केल्याने रिक्षाचालक व दुचाकीस्वारांना शिस्त लागली आहे. सातत्याने पोलीस फिरत असल्याने रिक्षा चालकही शिस्तीने गाड्या हाकतात. पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम साप्ते, रवींद्र शिंदे, गणपत झोरे, सुनील साळुंखे, सुभाष भुवड, प्रदीप भंडारी यांची टिम संपूर्ण शहरात कार्यरत असते. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे यावर पोलीस सातत्याने लक्ष ठेवून असतात. दोषी आढळल्यास ठोस कारवाई करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही दिवसात दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चिपळूण तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक ११, धूमस्टाईल वाहन चालवणे १७, पीयुसी नसणे १, विनापरवाना वाहन चालवणे २, सीटबेल्ट नसणे ११, वन-वेतून किंवा विरुध्द दिशेने वाहन चालवणे २२४, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे २२३ जणांवर कारवाई करुन १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
वाहतुकीला बसला आळा.
९५३ जणांकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड केला वसूल.
चुकीच्या ठिकाणी पार्किंग व वन-वे तून प्रवास करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई.
रिक्षाचालकांसह अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना लागली शिस्त.
प्रकारांत वाढ
चिपळूण परिसरात बेदरकारपणे वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी होत होती.